वऱ्हाड विचार मंचने रणनीती आखली
By Admin | Updated: June 22, 2014 23:48 IST2014-06-22T23:48:38+5:302014-06-22T23:48:38+5:30
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी दोन हात करुन नवे राजकीय व्यासपीठ स्थापन करण्याचे धाडस दाखविणाऱ्या संजय खोडके यांच्या वऱ्हाड विचार मंचचा मेळावा रविवारी येथील संत ज्ञानेश्वर

वऱ्हाड विचार मंचने रणनीती आखली
अमरावती : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी दोन हात करुन नवे राजकीय व्यासपीठ स्थापन करण्याचे धाडस दाखविणाऱ्या संजय खोडके यांच्या वऱ्हाड विचार मंचचा मेळावा रविवारी येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडला. या मेळाव्यात खोडके समर्थकांनी एकच गर्दी केली होती.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणून संजय खोडके यांनी पक्षाची भूमिका समर्थपणे सांभाळली; मात्र राष्ट्रवादीने आ. रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना अमरावती लोकसभेची उमेदवारी जाहीर करताच पक्षनेतृत्वाच्या या निर्णयाविरोधात संजय खोडके यांनी एल्गार पुकारला. काहीही झाले तरी राणा यांचे काम करणार नाही, ही स्पष्ट भूमिका घेतली. परिणामी खोडके यांना राष्ट्रवादीच्या प्रदेश महासचिव या पदावरुन हटविण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या काळात संजय खोडके यांनी वऱ्हाड विचार मंच या नावाने वेगळी संघटना काढून नवनीत राणा यांच्या पराभवाची मोहीम फत्ते केली. लोकसभा निवडणुकीनंतर आता खोडके यांनी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. वऱ्हाड विचार मंचची जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर करुन खोडकेंनी जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण सुरु केल्याचे स्पष्ट होते. बडनेरा व अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने हा मेळावा आयोजित केल्याचे निदर्शनास आले.
मेळाव्याच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब जवंजाळ होते. यावेळी मंचावर सुलभा खोडके, संजय खोडके, बाळासाहेब गौरखेडे, भाऊराव मेश्राम, अण्णासाहेब दिवे, कांतीभाई पटेल, मनीष बजाज, उमाळे काका, हमीद शद्दा, जस्सो जुम्मा नंदावाले, हाजी हारुण सुपारीवाला, तैय्यब अली, मधुकर सव्वालाखे, पुरुषोत्तम गावंडे, सुधाकर विरुळकर, प्रभाकर गुल्हाणे, अयुब खान, काळमेघ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)