नववर्षात उद्ध्वस्त झाले वंदनाबार्इंचे जग
By Admin | Updated: January 3, 2017 00:05 IST2017-01-03T00:05:32+5:302017-01-03T00:05:32+5:30
नववर्षाचा पहिला दिवस सायंकाळ होता होता असा काही भेसूर होईल की ‘त्या’ माऊलीचे सगळेच जगच कायमचे अंधारेल, असे कुणालाच वाटले नव्हते.

नववर्षात उद्ध्वस्त झाले वंदनाबार्इंचे जग
मोहन राऊत धामणगाव रेल्वे
नववर्षाचा पहिला दिवस सायंकाळ होता होता असा काही भेसूर होईल की ‘त्या’ माऊलीचे सगळेच जगच कायमचे अंधारेल, असे कुणालाच वाटले नव्हते. पतीचा भक्कम आधार आणि नवसासायासाने पदरी पडलेल्या चिमुरड्याची किलबिल आता कधीच ऐकू येणार नाही, या हृदयविदारक जाणिवेने ‘ती’ माता हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश करीत होता. अख्ख्या गावात स्मशानशांतता होती. मधूनमधून आसमंतात गुंजत होत्या तिच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या किंकाळ्या.
तूर सोंगायला गेलेला घरधनी आणि वडिलांना मदत म्हणून घरच्याच बकऱ्या चारण्याकरिता मागोमाग गेलेला चिमुकला. दोघेही तलावात बुडून मरण पावले. दोघांचेही सापडले ते पार्थिव देह. जिवनाचा अविभाज्य अंग असलेले दोघेही आता कधीच परतणार नाहीत, हे मान्य करण्यास वंदनाबाई तयारच नाहीत. त्यांचा आक्रोश गावकऱ्यांना बघवत नाही. अवघ्या दीड हजार लोकवस्तीच्या दाभाडा गावात सोमवारी स्मशानशांतता होती. प्रत्येक गावकऱ्याच्या डोळ्यांत अश्रू होते. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या त्या माऊलीची समजूत कशी घालावी, कोणालाच कळत नव्हते.
शेजारच्या आयाबायांनी ठोकळे कुटुंबाच्या घराभोवती गराडा घातलेला. पुरूष मंडळी लांब उभी राहून चर्चा करीत असलेली. आपला लाडका मित्र दर्शनचे काही तरी बरे वाईट झाल्याची चर्चा ऐकून भेदरलली लहान मुले, असेच वातावरण होते आज दाभाड्यात.
पित्यानेही घेतली तलावात उडी
अमरावती : रविवारी सकाळी सुधाकर ठोकळे स्वत:च्या मालकीच्या शेतात तूर सोंगण्याकरिता गेले. शाळेला सुटीच असल्याने देवाला हात जोडून आणि जेवण करून सकाळी दहा वाजता दर्शन देखील स्वत:ची सायकल घेऊन बकऱ्या चारण्याकरिता म्हणून वडिलांच्या मागोमाग गेला. दुपारी घरून आणलेल्या डब्यात दोघा बापलेकांनी जेवण केले. सायंकाळी घरी परतण्याची तयारी केली आणि दबा धरून बसलेल्या काळाने दोघांवरही झडप घातली.
तलावात पाणी पिण्याकरिता गेलेल्या बकऱ्या तलावात पडू नयेत म्हणून त्यांना हाकण्याकरिता दर्शनही मागोमाग गेला. पाय घसरून तो तलावात पडला. त्याचा आक्रोश ऐकून त्याला वाचविण्याकरिता पित्यानेही तलावात उडी घेतली. परंतु काळ प्रबळ होता. दोघेही तलावातून बाहेर पडू शकले नाहीत. तलावातील गाळात बुडून त्यांचा मृत्यू झाला. इकडे रात्र झाली तरी शेतातून सुधाकर व दर्शन परतले नाहीत, म्हणून वंदनाबार्इंची काळजी वाढू लागली. गावकरी गोळा झाले. शोधमोहिमेनंतर पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.
घरधन्यासह पोटच्या गोळ्याचा मृत्यू : दाभाड्यात पेटली नाही चूल
शाळेला सुटी
दर्शन हा धामणगाव रेल्वे येथील रावसाहेब रोंघे मेमोरियल स्कूलमध्ये इयत्ता दुसरीला शिकत होता. मितभाषी व अभ्यासात तल्लख असलेल्या दर्शनच्या मृत्युुमुळे सोमवारी त्याच्या शाळेतही शोकमय वातावरण होते. शाळेला एक दिवसाची सुटी देण्यात आली.
अपूर्णच राहिली दर्शनची गोडधोडाची फर्माईश
पित्या मागोमाग शेतात जाताना दर्शनने सायंकाळी घरी परतल्यानंतर गोडधोड करण्याची फर्माईश आई वंदनाकडे केली होती. नववर्षानिमित्त काही तरी कर..असा तगादा त्याने लावला होता. वंदनाबार्इंनी तसा बेतही केला होता. परंतु तो सिद्धीस जाऊ शकला नाही. त्यापूर्वीच पती आणि एकुलत्या एका मुलाचे निधन झाल्याने वंदनाबार्इंना जबर धक्का बसला आहे.
वीरेंद्र जगतापांनी केले ठोकळे कुटुंबाचे सांत्वन
संपूर्ण तालुक्याला हादरवून टाकणाऱ्या या घटनेची माहिती मिळताच आ. वीरेंद्र जगताप यांनी सोमवारी ठोकळे कुटुंबाला भेट देऊन वंदना ठोकळे यांचे सांत्वन केले. तसेच जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन साठवण तलावात साचलेल्या गाळाबाबत विचारणा केली. तलावाची सफाई केली नसल्याबाबत जाब विचारून शासनाने ठोकळे कुटुंबाला तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी केली.