प्रबोधनचे वैैभव कडू, राज गावंडे अव्वल
By Admin | Updated: June 17, 2014 23:56 IST2014-06-17T23:56:31+5:302014-06-17T23:56:31+5:30
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घोषित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात दर्यापूर तालुक्यातील प्रबोधन हायस्कूलचे विद्यार्थी वैभव कडू व राज गावंडे यांनी ९८.२० टक्के गुण

प्रबोधनचे वैैभव कडू, राज गावंडे अव्वल
निकाल ८२.५४ टक्के : ३५ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण
अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घोषित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात दर्यापूर तालुक्यातील प्रबोधन हायस्कूलचे विद्यार्थी वैभव कडू व राज गावंडे यांनी ९८.२० टक्के गुण संपादन करून संयुक्तरीत्या जिल्ह्यातून प्रथम स्थान प्राप्त केले. तर अमरावतीच्या सेंट फ्रान्सिस हायस्कूलचा विद्यार्थी शुभम् करवा याने ९८ टक्के गुणांसह जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकाविला.
अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याच्या १४ तालुक्यांमधूून सुमारे ४३ हजार ५९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ४३ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामधून ३५ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याची एकूण निकालाची टक्केवारी ही ८२.५४ इतकी आहे. जिल्ह्यातील एकूण २०९ केंद्रावरून ही परीक्षा घेण्यात आली. ३ ते २७ मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. यंदाही निकालाच्या एकूण टक्केवारीत मुलींचा वरचष्मा कायम आहे. बारावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली होती, हे विशेष.
एकेकाळी सर्वाधिक विद्यार्थी इंग्रजी आणि गणित या विषयांत अनुत्तीर्ण होत असत. परंतु यंदा शिक्षण मंडळाने इंग्रजी आणि गणित या बागुलबुवाची भीती दूर करण्यासाठी अभ्यासक्रमात केलेला सुटसुटीत बदल विद्यार्थ्यांच्या चांगलाच पथ्यावर पडलाय.
इंग्रजी विषयाचा सर्वाधिक ९९.०८ टक्के निकाल हा त्याची ग्वाही देतोय. शहरासह ग्रामीण भागातील ५०च्या जवळपास शाळांनी शभंर टक्के यश मिळविले आहे. गेल्या वर्षी जुनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल घोषित झाला होता. त्या तुलनेत यंदा मुलांना निकालाची प्रचंड प्रतीक्षा करावी लागली. धडधड वाढविणाऱ्या उत्सुकतेनंतर बऱ्याच विलंबाने दहावीचा निकाल घोषित झाला असला तरी मुलांमध्ये उत्साह दिसून आला. अकरावीच्या केंद्रीय पद्धतीच्या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी गर्दी होईल. (प्रतिनिधी)