पत्रकार भवनाच्या कोनशिलेचे अनावरण
By Admin | Updated: July 20, 2015 00:15 IST2015-07-20T00:15:18+5:302015-07-20T00:15:18+5:30
पे्रस क्लब आॅफ अमरावतीच्या पत्रकार भवनाचा कोनशीला अनावरण सोहळा रविवारी येथील वालकट कम्पाउंड परिसरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात पार पडला.

पत्रकार भवनाच्या कोनशिलेचे अनावरण
प्रेस क्लबचा कार्यक्रम : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव
अमरावती : पे्रस क्लब आॅफ अमरावतीच्या पत्रकार भवनाचा कोनशीला अनावरण सोहळा रविवारी येथील वालकट कम्पाउंड परिसरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात पार पडला. याप्रसंगी ३० वर्षे पत्रकारिता करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा भावपूर्ण गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री प्रभाकरराव वैद्य हे होते. मंचावर पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सुनील देशमुख, आमदार रवी राणा, आमदार अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले, महापौर चरणजित कौर नंदा, प्रेस क्लब आॅफ अमरावतीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, भाजपाचे शहर अध्यक्ष तुषार भारतीय उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांची आत्महत्या ही बातमी आहे. मात्र आत्महत्येनंतर त्या कुटुंबाची अवस्था काय, गावाची स्थिती काय, पुन्हा आत्महत्या होऊ नये म्हणून काय करायला हवे, या बातम्या देखील तेवढ्याच महत्त्वाच्या ठरतात. अशा बातमीदारीमुळे ती समस्या पुन्हा उद्भवू नये, यासाठी ठोस प्रयत्न होतात.
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्यावतीने आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केल्या जातात. मात्र विमानतळाच्या असुविधेने आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची गैरसोय होते. त्यामुळे येथे विमानतळ झाल्यास मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येतील व पुण्या-मुंबईत नोकऱ्या करणारे लाखो युवक पुन्हा विदर्भात परततील. दमदार उद्योग व कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद अमरावती जिल्ह्याला द्या, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकर वैद्य यांनी केले. प्रास्ताविक अनिल अग्रवाल, संचालन किशोर फुले यांनी केले. यावेळी शहर व जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांचे
भाकित खरे
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सकाळी सायंटीफिक एक्सप्लेनेशन दिले. आज पाऊस येतोच, असे ते म्हणाले. मी म्हणालो तुमचे म्हणणे खरे व्हावे. आज पाऊस आला. वेधशाळेचा अंदाज कधीच खरा ठरत नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे भाकित तातडीने खरे ठरले. जिल्हाधिकाऱ्यांना हवामान खाते घेऊन तर जाणार नाही ना, अशी भीती त्यामुळे निर्माण झाली आहे, असा विनोद मुख्यमंत्र्यांनी केला.
अमरावतीचा देशाला हेवा वाटतो
अमरावतीचा देशाला हेवा वाटावा, असे भरीव कार्य क्रिडा क्षेत्रात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे आहे. कबड्डीला खासी प्रतिष्ठा बहाल करण्याचे श्रेय या मंडळाकडे जाते, असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आवर्जून केला.
३० वर्षे अविरत सेवा
देणाऱ्या पत्रकारांचा गौरव
सतत ३० वर्षे समाजाचा सजग प्रहरी म्हणून सेवा देणाऱ्या उल्हास मराठे, नवीनचंद्र शहा, चेतन पसारी, अशरफभाई, रोहितप्रसाद तिवारी, गिरधर देशमुख या ज्येष्ठ पत्रकारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.