तलाईत विनापरवानगी १९ साग वृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST2021-02-05T05:32:45+5:302021-02-05T05:32:45+5:30
धारणी : येथील तलाई अंतर्गत येत असलेल्या शेत सर्व्हे नंबर ३५ ब या जमिनीचे प्रकरण उपविभागीय अधिकारी कार्यालयात न्यायर्थ ...

तलाईत विनापरवानगी १९ साग वृक्षांची कत्तल
धारणी : येथील तलाई अंतर्गत येत असलेल्या शेत सर्व्हे नंबर ३५ ब या जमिनीचे प्रकरण उपविभागीय अधिकारी कार्यालयात न्यायर्थ प्रलंबित आहे. यादरम्यान जमिनीचे मूळ मालक शेख बशीर शेख लाल यांनी या जमिनीवर साग वृक्षांची अवैध कत्तलीची तक्रार धारणी येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे केली आहे. वृक्षतोडीची परवानगी देणाऱ्या आदेशाची प्रत त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे माहिती अधिकारांतर्गत मागितली. पण, अशी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.
शेख बशीर शेख लाल यांनी प्रकरणातील गैरअर्जदारांनी शेतामधील १९ सागवृक्ष परस्पर कापून विकल्याची तक्रार नोंदविली होती. त्याअनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील वर्तुळ अधिकाऱ्यांनी सदर शेतामधील वृक्षतोड झालेल्या खोडांचा पंचनामा केला. मात्र, पुढे हे प्रकरण थंडबस्त्यात टाकण्यात आले.
याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी १९ सागवृक्ष कापण्याची परवानगी वनविभागाकडून देण्यात आली नसल्याचे सिद्ध झाल्यानंतरही वनविभागाकडून वनगुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. त्यामुळे शेख बशीर शेख लाल यांनी धारणी येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे संबंधितांविरुद्ध वनगुन्हा कायम करण्याबाबत विनंती केली आहे. याप्रकरणी सविस्तर चौकशीअंती योग्य कारवाई करण्याचे आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली आहे.
एकीकडे उपविभागीय अधिकारी कार्यालयातून संबंधित जमिनीवरील खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद करण्यात आले. दुसरीकडे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे आदेशान्वये खोटे फेरफार प्रकरणाचीसुद्धा चौकशी पोलिसांकडे सोपविण्यात आली आहे. अशातच वनविभागाकडे सुद्धा अवैध वृक्षतोडीचे प्रकरण दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधितांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.