दोन हजार विद्यार्थी १० फेब्रुवारीला उतरणार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST2021-02-05T05:33:01+5:302021-02-05T05:33:01+5:30
जरूड : येथील बस स्थानकापुढून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गतिरोथक बसविण्याच्या मागणीसाठी तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांसह जरूडचे नागरिक रस्त्यावर उतरून ...

दोन हजार विद्यार्थी १० फेब्रुवारीला उतरणार रस्त्यावर
जरूड : येथील बस स्थानकापुढून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गतिरोथक बसविण्याच्या मागणीसाठी तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांसह जरूडचे नागरिक रस्त्यावर उतरून 10 फेब्रुवारीला चक्काजाम आंदोलन करणार आहेत. सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे आतापर्यंत या मार्गावर ११ बळी गेले आहेत.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रोशन दारोकार यांनी दिलेल्या निवेदनानुसार, वरूड-अमरावती महामार्गावर २२ हजार लोकवस्तीचे जरूड गाव आहे. नव्याने झालेल्या महामार्गाचे रुंदीकरण व लावलेल्या दुभाजकामुळे येणारे वाहन दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. यातच यापूर्वी झालेल्या अपघातात डाॅ. हेमा पाटील, जयवंत यावले, विठ्ठलराव धस, जयवांताबाई खात्री, उत्क्रांती शाळेचा विद्यार्थी अलोणे (रा. जरूड) यांच्यासह तब्बल ११ जणांना प्राण गमवावे लागले. महामार्गाच्या दोन्ही बाजूला बाळासाहेब देशमुख कन्या शाळा, जरूड हायस्कूल, विवेकानंद इंग्लिश स्कूल, जि.प. मुलांची प्राथमिक शाळा, शशिकलाबाई बोरकर प्राथमिक शाळा, कला वाणिज्य महाविद्यालय, उत्क्रांती शिक्षण संस्थेच्या विविध शाळा असून, ३५०० विद्यार्थी दररोज शिक्षण घेत असतात. या विद्यार्थ्यांना ६० फुटांचा महामार्ग जीव मुठीत घेऊन ओलांडावा लागतो.
यापूर्वी या ठिकाणी झालेल्या अपघातामुळे गतिरोधक बसविण्यासाठी मोठे जनआंदोलन झाले होते आणि त्यानंतर प्रशासनाला जाग येऊन गावात तीन ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले होते. परंतु, एचजी इन्फ्रा या कंपनीने केलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे ते नाहीसे झाले. यामुळे आता वाहने सुसाट धावतात. वारंवार निवेदन आणि विनंती करूनसुद्धा अधिकारी या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक, विद्यार्थ्यांनी हा पवित्रा घेतला आहे.