दोन हजार विद्यार्थ्यांना मिळेल प्रज्ञाशोध स्कॉलरशिप
By Admin | Updated: September 23, 2015 00:20 IST2015-09-23T00:20:41+5:302015-09-23T00:20:41+5:30
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची स्कॉलरशिप (एनटीएसई) यापुढे दोन हजार विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

दोन हजार विद्यार्थ्यांना मिळेल प्रज्ञाशोध स्कॉलरशिप
शैक्षणिक : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळेल संधी
अमरावती : राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची स्कॉलरशिप (एनटीएसई) यापुढे दोन हजार विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. आतापर्यंत वर्षभरात एक हजार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जात होती. इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना यात संधी मिळते. त्याचा त्यांना चांगला फायदाही होणार आहे.
दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रज्ञाशोध व राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर ही स्कॉलरशिप दिली जाते. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या रकमेचा उपयोग होतो, हे स्कॉलरशिपसाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय पाहून मानव संसाधन विकास विभागाने घेतला आहे. याच विभागाच्या वेबसाईटवर अशा प्रकारचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. याचा फायदा शिक्षणात अग्रेसर असलेल्या मात्र आर्थिक स्थितीने कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे बहुतांश मुले दहावीतच शिक्षण सोडून देतात.
यामध्ये मानसिक क्षमता व शैक्षणिक योग्यतेचा विचार करून यापुढे स्कॉलरशिप दिली जाणार आहे. या दोन्ही परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांमधील क्षमतांचा कस लागतो. त्यामुळे परीक्षेपूर्वीच अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असते. (प्रतिनिधी)
दोन स्तरावर होणार परीक्षा
ही स्कॉलरशिप परीक्षा दोन स्तरावर घेतली जाते याची परीक्षाही वेगवेगळी असते. पहिल्या स्तरावर विद्यार्थ्यांच्या बुद्धीमापनासाठी परीक्षा होते. यातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील दुसऱ्या स्तरावरील परीक्षेला प्रविष्ट होता येते. राष्ट्रीयस्तराची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीपासून पीएचडीपर्यंत स्कॉलरशिप देण्यात येते.
उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी असे गुण आवश्यक
प्रज्ञाशोध परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांकडे फॉर्म जमा करावे लागतील. यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी सर्वसाधारण गटासाठी ४० टक्के गुण आवश्यक आहेत, तर एससी, एसटी तसेच ओबीसीसाठी ३५ टक्के गुण अपेक्षित राहतील. या परीक्षेत विद्यार्थ्यांना तीन पेपर द्यावे लागणार आहेत.
जिल्हा परिषदेत अर्ज उपलब्ध
इयत्ता दहावीचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. त्यासाठी 'एनसीइआरटी डॉट को डॉट इन' या वेबसाईटवर माहिती मिळू शकणार आहे. माहितीवरून मुख्याध्यापकांशी संपर्क साधून अर्ज भरल्याची प्रक्रिया पूर्ण केली जातात. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातही प्रज्ञाशोध परीक्षेचे अर्ज मिळते.
परीक्षेचे वेळापत्रक जारी
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी सीबीएसईने वेळापत्रक जारी केले आहे. विद्यार्थ्यांमधील प्रतिमा शोधणारी ही परीक्षा राज्य व राष्ट्रीय स्तरावर होणार आहे. यामध्ये चांगले गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाईल. ही परीक्षा वेगवेगळ्या तारखांना व वेगळ्या स्तरावर होणार आहे. पहिली राज्यस्तरीय परीक्षा ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे तर दुसरी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा ८ मे २०१६ रोजी होणार आहे.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ही राज्य व राष्ट्रीयस्तरावर घेतली जाते. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, याबाबत अधिक माहितीसाठी माध्यमीक शिक्षण विभागाशी संपर्क करावा
- सी.आर. राठोड, माध्यमिक शिक्षणाधिकारी.