अमरावती जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:14 IST2021-09-21T04:14:30+5:302021-09-21T04:14:30+5:30
२०एएमपीएच०१ - अंबादास ताथोड शिंदी बु./येवदा (अमरावती) : अमरावती जिल्ह्यात १८ सप्टेंबर रोजी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अचलपूर व ...

अमरावती जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
२०एएमपीएच०१ - अंबादास ताथोड
शिंदी बु./येवदा (अमरावती) : अमरावती जिल्ह्यात १८ सप्टेंबर रोजी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अचलपूर व दर्यापूर तालुक्यात या घटना उघडकीस आल्या आहेत.
अत्यल्प भूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथे घडली. अंबादास आकाराम ताथोड (६५) असे मृताचे नाव आहे. त्यांच्याकडे ६० आर कोरडवाहू शेती आहे. संततधार पावसाने शेतातील सोयाबीन पीक पूर्णतः सडले. यामुळे सोसायटीचे काढलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी व दिव्यांग मुलगी आहे.
येवदा (ता. दर्यापूर) पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळोद येथील रहिवासी भरत गणेश ढबाले (३२) या अत्यल्प भूधारक शेतकऱ्यानेही नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. त्यांची चौघा भावांमध्ये दोन एकर शेती होती, शिवाय कोरोनाकाळात बेरोजगारीची कुऱ्हाड त्याच्यावर कोसळली होती. शनिवारी राहत्या घरी कोणी नसताना त्याने गळफास घेतला. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे.