१०० वर आदिवासींना डायरियाची लागण
By Admin | Updated: May 23, 2016 00:14 IST2016-05-23T00:14:03+5:302016-05-23T00:14:03+5:30
तालुक्यातील बागलिया येथे विहिरीचे दूषित पाणी प्यायल्याने १०० वर आदिवासींना शनिवारपासून अतिसाराची लागण झाली आहे.

१०० वर आदिवासींना डायरियाची लागण
नरेंद्र जावरे चिखलदरा
तालुक्यातील बागलिया येथे विहिरीचे दूषित पाणी प्यायल्याने १०० वर आदिवासींना शनिवारपासून अतिसाराची लागण झाली आहे. त्यापैकी चार गंभीर रूग्णांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेतर्फे जिल्हा परिषद शाळेत रूग्णांवर उपचार सुरु आहेत. उपचाराकरिता रुग्णांना बाहेर पाठविण्यासाठी रविवारी दुपारी आदिवासींनी रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर आता त्यांना उपचारासाठी बाहेर पाठविण्यात येत आहे.
तहसीलदार किशोर बागडे स्वत: तळ ठोकून असून परिस्थिती नियंत्रणात आहे. बागलिया येथे एक हातपंप व विहिरीचे पाणी आदिवासी पिण्यासाठी वापरतात. पाण्याची पातळी खाली गेल्याने विहिरीतील झऱ्यातून पाण्याचे स्त्रोत कमी झाले आहे. परिणामी गढूळ पाण्यावर बागलियावासियांना तहान भागवावी लागत आहे. शनिवारी दुपारी ११ वाजतानंतर गावकऱ्यांना अचानक उलटी व शौचाचा त्रास सुरु झाल्याचे आदिवासींचे म्हणणे आहे. घराघरातून रुग्ण निघू लागल्याने टेंभ्रुसोडा प्राथमिक आरोग्य केंद्राला गावकऱ्यांनी तशी माहिती दिली.
बागलिया येथील लोकसंख्या ७८० इतकी आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता शनिवारी सायंकाळी येथील जिल्हा परिषद शाळेत आरोग्य यंत्रणेने दवाखाना सुरु केला.टेंब्रुसोंडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एस.एस.मरसकोल्हे, रोहन गिते, अमित गिते, अकुंश मानकर या चार डॉक्टरांची चमू रुग्णांवर उपचार करीत असून सुरेंद्र गैलवार, खंडारे, अरविंद पिहुलकर, डाबर, ज्योती साखरे, पट्टे, भोसले, गडिलेवाल आदी आरोग्य कर्मचारी तळ ठोकून आहेत. बागलिया येथील सचिव तायडे गावात राहत नसल्याने दूषित पाण्याचा वापर गावकऱ्यांना करावा लागला. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अतिसारची लागण झाल्याचे आदिवासींचे म्हणणे होते. सचिवावर कारवाईची मागणी त्यांनी केली. दूषित पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हे आहेत
अतिसाराचे रुग्ण
राखी धांडेकर (१६), मालती धांडेकर (१८), रोहिणी बेलसरे ११, दिनेश धांडेकर २३, पार्वती भास्कर ४५, फुलवंती धिकार ३०, रिचाय धिकार २ वर्ष, संतोष शेलेकर, ६ वर्ष, पूनम बेलसरे १९, रामकली बेलसरे २८, शारदा तोटे २९, माणिकराव भास्कर २७, तुळशीराम भास्कर ४५, फुलकाय कास्देकर ४५, रिता मावस्कर २२, विलास बेलसरे १७, मनकू मावस्कर २२, बबिता मावस्कर २०, आेंकार बेलसरे ६५, शांता शेलूकर २५, प्रभू मावस्कर
गावकऱ्यांनी केला रस्ता रोको
शनिवारी सकाळी ११ वाजतापासून बागलिया येथे अतिसाराची लागण झाली असताना रविवारी दुपारपर्यंत रुग्णांच्या संख्येत सारखी वाढ होत असल्याने संतप्त गावकऱ्यांनी रुग्णांना पुढील उपचारासाठी 'रेफर' करण्याची मागणी रेटून धरली व या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले होते. प्रशासनाच्यावतीने तहसीलदार किशोर बागडे यांनी त्याची दखल घेत बागलिया येथे भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
चार रुग्ण रेफर
बागलिया येथे शंभरावर डायरियाचे रुग्ण असताना गंभीर चार रुग्णांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये बबीता मुन्ना मावस्कर (२०), शांता सुनील सेलुकर (२५), ओंकार मनसू बेलसरे (३५) आणि शिनू दहीकर (७०) या वृद्धेचा समावेश असून आदिवासी संघटनेचे महादेव कास्देकर, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल, सरपंच झिंगू धांडे, उपसरपंच मुंगीलाल कास्देकर आदी गावकऱ्यांच्या सहकार्याने मदतकार्य सुरु होते.