वृक्षलागवड खड्ड्यांविना अडली

By Admin | Updated: July 21, 2015 00:19 IST2015-07-21T00:19:48+5:302015-07-21T00:19:48+5:30

पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन याबाबत जागरुकता होणे आवश्यक आहे.

Tree without wood patch | वृक्षलागवड खड्ड्यांविना अडली

वृक्षलागवड खड्ड्यांविना अडली

योजनेचा फज्जा : पावसाळा संपतोय, खड्डे खोदणार तरी कधी ?
चांदूरबाजार : पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन याबाबत जागरुकता होणे आवश्यक आहे. पण तसे झाले नाही. शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत यावर्षी पुन्हा वृक्षारोपणाचा बिगूल वाजला आहे. या योजनेसाठी योग्य आकारमानात एप्रिल महिन्यात खड्डे खोदणे अपेक्षित होते. पण, काही गावांमध्ये अद्यापही याप्रक्रियेला सुरुवात झालेली नाही.
शासनातर्फे पर्यावरणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातात. याअंतर्गत शतकोटी वृक्षलावड ही चांगली योजना शासनाने सुरू केली आहे. काही ठिकाणी कागदावरच वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन होत असल्याचा आरोप वृक्षप्रेमी व नागरिकांनी केला आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वृक्षलागवड जरी जून, जुलै महिन्यात करण्यात येत असली तरी यासाठी खड्डे खोदणे व इतर प्राथमिक कामे एप्रिलपर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. आता जुलैचा महिना पूर्णत्वास जात आहे. मात्र काही गावांमध्ये वृक्षारोपणासाठी अद्यापही खड्डेच खोदण्यात आलेली नाहीत. यामुळे या योजनेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
दरवर्षी विविध विभागाकडून वृक्षारोपण केले जाते. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. परंतु लावलेली किती झाडे जगली, याचे मूल्यमापन अर्थात आॅडिट होत नसल्याने शासनाचे कोट्यवधी रुपये मातीत जात असल्याचा आरोप वृक्षप्रेमी व नागरिक करीत आहेत. यावर्षी पुन्हा शतकोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट प्रत्येक गावाला देण्यात आलेले आहे. मागील वर्षी काही गावांमध्ये या योजनेची प्रत्यक्षात अंमलबाजावणी झाली काय? हा संशोधनाचा विषय ठरत आहे, असेही अनेकांचे म्हणणे आहे.
जंगल तोडीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, पाण्याची घटती पातळी अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्र शासनाने वृक्षारोपणाबाबत पुढाकार घेतला आहे. शासनाच्या निर्देशानुसार विविध शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, निमशासकीय संस्था, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाकडून दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. मात्र बोटावर मोजण्या इतक्या गावातच योजना यशस्वी होते. काही गावांत मागील वर्षीच्या खड्ड्यातच अथवा कागदावर दाखविलेल्या कागदाच्या खड्ड्यात वृक्षारोपण केले जाते, असे अनेकांचे म्हणणे आहे. यावर्षी पुन्हा वृक्षलागवडीचा बिगूल वाजविण्यात येत आहे. मागील वर्षी दिलेल्या उद्दिष्टांपैकी किती झाडे जिवंत आहेत याचाही विचार होणे गरजेचे आहे. यावर्षीचे पुन्हा उद्दिष्ट देण्यात आले असून पुन्हा शासनाचे कोट्यवधी रुपये मातीत जातील, असा अंदाज गावकरी लावत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Tree without wood patch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.