आदिवासी शेतकऱ्यांभोवती अवैध सावकारीचा पाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 05:00 AM2020-09-16T05:00:00+5:302020-09-16T05:00:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांनी परतवाडा येथील सावकारांकडे गहाण ठेवलेले दागिने शासनाने मंजूर केलेल्या कर्जप्रकरणानंतर परत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांनी परतवाडा येथील सावकारांकडे गहाण ठेवलेले दागिने शासनाने मंजूर केलेल्या कर्जप्रकरणानंतर परत करण्यात आले आहेत. दीड हजारांवर लाभार्थी मात्र अजूनही वंचित आहेत. सोमवारी चिखलदरा पंचायत समितीचे सभापती बन्सी जामकर, उपनिबंधक अच्युत उल्हे यांच्या उपस्थितीत ४० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना त्यांचे गहाण दागिने परत दिले गेले. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते.
मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ करून, त्यांनी परतवाडा येथील सावकारांकडे गहाण ठेवलेले दागिने परत करण्याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी चिखलदरा पंचायत समितीचे सभापती बन्सी जामकर यांनी केली होती. अशिक्षित, पेचात सापडलेल्या आदिवासींना मोठ्या प्रमाणात फसविले जात असल्याचे आता पुढे येऊ लागले आहे. सावकाराच्या गहाण पावत्या शेतकºयांकडे असताना, शासनदप्तरी ते गहाण सोडविण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत येथील सहायक निबंधक कार्यालयात आदिवासी शेतकऱ्यांसह सभापतींनी धडक दिली.
‘लोकमत’च्या वृत्ताची आमदारांकडून गंभीर दखल
आदिवासी शेतकरी सावकारी पाशात अडकल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर आमदार राजकुमार पटेल यांनी गत आठवड्यात चिखलदरा तहसील कार्यालयात बैठक बोलावली. तहसीलदार माया माने, मंडळ अधिकारी व काही आदिवासी शेतकरी उपस्थित होते. अपात्र आदिवासी शेतकºयांना पात्र करण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता.
केवळ ६७ पात्र
दीड हजार अपात्र
चिखलदरा तालुक्यातील दीड हजारांपैकी केवळ ६७ आदिवासी शेतकऱ्यांना सावकारी कर्जात पात्र ठरविण्यात आले आहे, तर दीड हजारांवर शेतकऱ्यांपैकी ६०० पेक्षा अधिक आदिवासी शेतकऱ्यांनी सावकाराकडील आपले गहाण सोडून देण्यात आल्याचा खोटा शेरा लिहिण्यात आला. प्रत्यक्षात त्यांच्याकडे गहाण पावत्या आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे कुठेच नाव नाही, हे विशेष. ६७ पात्र शेतकऱ्यांना त्यांचे गहाण सोमवारी उपनिबंधक कार्यालयात परत करण्यात आले. यावेळी दादा खडके, प्रकाश जामकर, देविदास कोगे, भीमराव काळे आदी शेतकरी उपस्थित होते.