आष्टगावच्या विद्युत कार्यालयात तोडफोड
By Admin | Updated: October 14, 2015 00:30 IST2015-10-14T00:30:01+5:302015-10-14T00:30:01+5:30
पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी १२ आॅक्टोबर रोजी आष्टगाव येथील विद्युत कंपनीच्या उपकेंद्रावर धाव घेऊन कार्यालयाची तोडफोड केली.

आष्टगावच्या विद्युत कार्यालयात तोडफोड
नागरिकांचा संताप : ९ जणांना अटक, ७५ हजारांचे नुकसान
मोर्शी : पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी १२ आॅक्टोबर रोजी आष्टगाव येथील विद्युत कंपनीच्या उपकेंद्रावर धाव घेऊन कार्यालयाची तोडफोड केली. यामुळे ७५ हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली आहे.
अटक झालेल्यांमध्ये दीपक खोडस्कर, गजानन दहेकर, वैभव खोडस्कर, स्वप्निल टाकळे, शरद, शैलेश झाडे, उत्कर्ष धोटे, देवेंद्र भुयार, सारंग खोडस्कर यांचा समावेश आहे. तर निस्वादे आणि १५ अन्य आरोपींचा शोध मोर्शी पोलीस घेत आहेत.
आॅक्टोबर महिन्यात तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ओलिताचा वापर करतात. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे सोमवारी दूपारी ११.३० च्या सुमारास अंबाडा येथील शेतकरी मोठ्या संख्येत गोळा होऊन त्यांनी आष्टगाव येथील राज्य वीज कंपनीच्या उपकेंद्रावर धाव घेतली. त्यावेळी प्रभारी कनिष्ठ अभियंता सुशील तायडे कार्यालयात होते.
जोपर्यंत कार्यकारी अभियंता चौधरी येत नाही, तोपर्यंत आपण येथून हटणार नाही, अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली. कनिष्ठ अभियंता सुशील तायडे यांनी कार्यकारी अभियंता चौधरी, प्रभारी सहायक अभियंता बारई, कनिष्ठ अभियंता जैस्वाल आदींना घटनेची माहिती दिली. दरम्यान, कार्यकारी अभियंता चौधरी आणि इतर अधिकारी आष्टगाव येथे पोहोचले. त्यांनी तणावाची स्थिती नियंत्रणात आणली. (तालुका प्रतिनिधी)