तीन हजार कुटुंबांची निवाऱ्यासाठी भटकं ती
By Admin | Updated: October 24, 2015 00:11 IST2015-10-24T00:11:12+5:302015-10-24T00:11:12+5:30
छोट्याशा घराचे स्वप्न पाहणारे तालुक्यातील तीन हजार कुटुंबे हक्काच्या निवाऱ्यासाठी भटकंती करीत आहेत़..

तीन हजार कुटुंबांची निवाऱ्यासाठी भटकं ती
प्रतीक्षा यादी कधी होणार पूर्ण : ग्रामीण विकास यंत्रणेचे दुर्लक्ष, जागेअभावी अडले घरकूल, तोडगा मात्र नाही
धामणगाव रेल्वे : छोट्याशा घराचे स्वप्न पाहणारे तालुक्यातील तीन हजार कुटुंबे हक्काच्या निवाऱ्यासाठी भटकंती करीत आहेत़ तालुक्याची प्रतीक्षा यादी मोठी तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून नाममात्र घरकुलांची संख्या तालुक्याला मिळत आहे़ अनेक कुटुंबांना घरकूल मंजूर झालीत. मात्र जागा उपलब्ध करून देण्याकरिता महसूल प्रशासन याबाबत तोडगा काढण्याऐवजी कागदपत्रांचा लपाछपीचा खेळ खेळत असल्याने या कुटुंबांना न्याय कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे़
धामणगाव तालुक्यात इंदिरा आवास घरकूल योजनेची अवस्था बिकट आहे़ जिल्हा प्रशासनाकडून प्रतीक्षायादीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे इतर मागासवर्गीय गटातील १ हजार ४४ कुटुंबांना अद्यापही हक्काचे घरकूल मिळालेले नाहीत़ जळगाव आर्वी येथील या गटातील २० कुटुंबांना आजही प्रतीक्षा करावी लागत आहे़ येथील सरपंचा सोनाली धीरज मुडे यांनी ग्रामीण विकास यंत्रणेला पत्रव्यवहार करून या उपेक्षित लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी मुडे यांनी केली आहे़ सावळा येथील ३० लाभार्थ्यांना घरकूल मिळावे म्हणून बाजार समितीचे संचालक अविन टेकाडे यांनी आता लोकशाही पद्धतीने प्रशासनाशी दोन हात करण्याची तयारी दर्शविली आहे़ वडगाव राजदी या गावातील ३५ कुटुंबे आजही कुडामातीच्या घरात वास्तव्य करीत आहेत़ उपसरपंच नितीन काळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे़ रायपूर कासारखेड या जुळ्या गावातील ३७ जणांना न्याय मिळावा म्हणून येथील सरपंचा कीर्ती शिषीर राऊत लालफीतशाहीकडे न्याय मागात आहे़ सोनेगाव खर्डा येथील सरपंच प्रवीण खैरकार यांनी प्रतीक्षा यादीतील ५० लाभार्थ्यांना घरकूल मिळावे म्हणून ग्रामीण विकास यंत्रणेच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे़ जळगाव मंगरूळ येथील २६ लाभार्थांना थेट जिल्हा प्रशासनाच्या दरबारात येथील उपसरपंच मनोज शिवणकर यांनी हक्काचे घरकूल कधी देणार, असा सवाल विचारला आहे़ गव्हाफरकाडे येथील सरपंच दुर्याेधन राघोर्ते यांनी ३६ लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी हक्काची लढाई लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे़ तळेगाव दशासर येथील सरपंच मनोज बानोडे यांनी ७४ लोकांना न्याय मिळावा म्हणून प्रशासनाला निवेदन दिले आहेत़ वाढोणा येथील सरपंचा महानंदा तितरे व चिंचोली येथील सरपंच तुषार सोरटकर यांनी त्यांच्या गावातील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थी बिकट जीवन जगत असल्याचा पुरावा जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे़ मंगरूळ दस्तगीर येथील ६९ लाभार्थ्यांना घरकूल मिळवून देण्याकरिता सरपंच अर्चना भोंगे प्रशासनाला धारेवर धरत आहे़ उसळगव्हाणचे सरपंच नितीन कोेंडेकार, देवगाव येथील उपसरपंच विशाल जयस्वाल, अंजनवतीचे सरपंच विठ्ठल सपाटे, तिवरा येथील सरपंच रणजित घुसळकर, वाठोड्याच्या सरपंच स्नेहल जायले, विठाळ्याचे मंगेश ठाकरे, हिंगणगाव येथील मंगला हगवणे, आसेगावच्या अनिता यादव, निंभोरा राज येथील जयंत बमनोटे, कासारखेडचे उपसरपंच नितीन मेंढुले, बोरगाव धांदेच्या उपसरपंच नंदा सावंत, झाडगाव येथील सरपंच ललिता रावेकर, तळणीचे सरपंच रामेश्वर डहाके, कळाशीचे संदीप मिर्चापुरे, झाडा येथील शुभांगी चौधरी, पेठ रघुनाथपूर येथील विजय राऊत, चिंचपूरच्या उषा घटाळे, शेेंदुरजना खुर्द येथील वंदना देशमुख, वाघोलीचे सरपंच विजय गायकवाड, अशोकनगर येथील सरपंच सीमा गुल्हाने, निंबोलीचे सरपंच ज्योती पवार, वरूड बगाजी येथील उपसरपंच बिपिन दगडकर, हिरपूरचे सरपंच रवीश बिरे, दाभाड्याच्या सरपंच शशीकला नेवारे, पिंपळखुटा येथील सरपंच शशीकला माळोदे, जुना धामणगावच्या सरपंच प्रतिभा ढाकुलकर, जळका येथील सरपंच अर्चना सातकर, वसाड येथील सरपंचा कांचन ढोमणे हे लोकप्रतिनिधी त्यांच्या गावातील लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळवून देण्याकरिता सातत्याने जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवीत आहेत. त्यांनी न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
घरकूल पूर्ण होणार कसे ?
गोरगरिबांचे घराचे स्वप्न साकार व्हावे म्हणून केंद्र शासनाने इंदिरा आवास योजना सुरू केली़ केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून १२ बाय १२ च्या दोन खोल्यांच्या २६९ चौरस फूट बांधकामासाठी ९५ हजार रूपये मिळतात. सध्याच्या महागाईच्या काळात ९५ हजार रूपयांत घरकूल हा प्रकार हास्यास्पदच बनला आहे़ अनुदानाचा हा प्रकार म्हणजे नसल्यापेक्षा असलेले बरे, असा आहे.
जागेचा प्रश्न प्रलंबित
तालुक्यातील अनेक गावांमध्ये रिकामी जागा आहे़ ग्रामपंचायतीने या जागेचा ठराव घेऊन तालुका प्रशासनाला दिला आहे़ याबाबत पंचायत समितीने अहवाल सादर केला़ परंतु ले-आऊट मंजूर करण्यात महसूल प्रशासन मागे-पुढे पाहत आहे़ उपविभागीय अधिकाऱ्यांकडे या जागेसंदर्भात प्रकरणच पाठविले जात नसल्याची माहिती आहे़ शासन घरकूल देण्यास तयार असूनही महसूलमधील खाबुगिरीमुळे खऱ्या लाभार्थ्यांना घरकूल मिळत नाही़ जळगाव आर्वी येथे जागा उपलब्ध आहेत़ येथे ले-आऊट टाकून लाभ मिळणे अपेक्षित असताना हे प्रकरण महसूल विभागात धूळखात पडले आहे़
इहलोकी गेल्यावर मिळणार का घरकूल ?
तळेगाव दशासर येथील शीला अरूण माथने यांचे दारिद्रयरेषेच्या मागील यादीत १६ गुण होते़ परंतु प्रशासकीय यंत्रणेने १६ ऐवजी ३९ गुणांची नोंद केली आहे, असे माथने कुटुंबाचे म्हणणे आहे़ तेव्हापासून हे कुटुंब लालफितशाहीशी लढा देत आहे़ रहायला घर नसल्याने सध्या हे कुटुंब भाड्याच्या खोलीत जीवन कंठत आहे़ मागील आठ वर्षांपासून प्रत्येक विभागाला निवेदने दिलीत. परंतु कोणीही समाधानकारक उत्तर दिले नाही़ या कु टुंबाने स्थानिक पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले़ मात्र, अद्यापही त्यांना घरकूल मिळाले नाही. आता विभागीय आयुक्त कार्यालयात हे प्रकरण धूळखात पडले आहे़
पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे
धामणगाव तालुका मागील अनेक वर्षांपासून इंदिरा आवास तसेच इतर घरकूल योजनेपासून वंचित आहे़ हक्काचे घरकूल मिळावे म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी आपली संघर्षाची लढाई सातत्याने लढत आहेत. अनेक दिवसांपासून बीपीएल यादीचा घोळ कायम आहे़ प्रतीक्षा यादी मोठी आणि तालुक्याला मिळणाऱ्या घरकुलांची संख्या कमी त्यामुळे प्रचंड ओढाताण सुरू आहे. आता पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी तालुक्यातील या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे़
सभापती व उपसभापतींचा संघर्ष कायम
पात्र लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून पंचायत समितीचे सभापती गणेश राजनकर, उपसभापती अतुल देशमुख यांनी वारंवार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठपुरावा केला. दर महिन्याला कार्यालयात जाऊन ते आढावा घेतात. अन्याय दूर न झाल्यास सरपंच, उपसरपंचांसह उपोषणाला बसण्याचा इशारा राजनकर, देशमुख यांनी दिला आहे.