नगरपंचायतींची तीन नावे चुकीची
By Admin | Updated: March 9, 2015 00:37 IST2015-03-09T00:37:24+5:302015-03-09T00:37:24+5:30
तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायतऐवजी नगरपंचायत स्थापनेच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे.

नगरपंचायतींची तीन नावे चुकीची
दुरूस्ती महत्त्वाची : भातकुळी, नांदगाव खांडेश्वर, तेवसा असा उल्लेख
अमरावती : तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायतऐवजी नगरपंचायत स्थापनेच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. नगरपंचायत निर्मितीच्या शासकीय अधिसूचनेत धारणी व्यतिरिक्त अन्य तीन प्रस्तावित नगरपंचायतींचा चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने आता नाव दुरूस्तीचा प्रस्ताव नगरविकास विभागाला पाठविणे महत्त्वाचे आहे.
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५, कलम ३४१-क चे पोटकलम (१) (क) आणि (२) यांच्या तरतुदीनुसार संबंधित ग्रामपंचायतींचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र आणि तालुका मुख्यालय असल्याने हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्याच्या आणि त्या स्थानिक क्षेत्रासाठी नगरपंचायत गठित करण्याच्या दृष्टीने शासनाद्वारे अधिसूचना जाहीर केल्यात. शासनाच्या राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या आत कुठलाच आक्षेप आलेला नाही. त्यामुळे तिवसा, भातकुली, धारणी व नांदगाव खंडेश्वर येथे नगरपंचायती स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
अशी आहे नावात चूक
नगर विकासने जाहीर केलेल्या अधिसूचनेत केवळ धारणी ग्रामपंचायतीचा उल्लेख योग्य केला आहे. मात्र, भातकुली ऐवजी भातकुळी, नांदगाव खंडेश्वरऐवजी नांदगाव खांडेश्वर, तिवसाऐवजी तेवसा असा चुकीचा उल्लेख केलेला आहे.
शासन अधिसूचनेत प्रस्तावित तीन नगरपंचायतींच्या नावात चूक झाली. हे निदर्शनास येताच दुरूस्तीचा प्रस्ताव नगरविकास विभागाला जिल्हा प्रशासनाने पाठविला आहे.
- ए.जी.तडवी,
जिल्हा प्रशासन अधिकारी
नगरपालिका विभाग.