हजारो एकरांतील उडीद पाण्याखाली
By Admin | Updated: September 25, 2016 00:26 IST2016-09-25T00:26:09+5:302016-09-25T00:26:09+5:30
दर्यापूर तालुक्यात ८ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. परंतु सवंगणी केलेल्या उडीद पिकांचे ढीग पावसात भिजून सडत आहे.

हजारो एकरांतील उडीद पाण्याखाली
नवे संकट : लेहेगाव परिसरातील शेतकरी चिंतेत
लेहेगाव रेल्वे : दर्यापूर तालुक्यात ८ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. परंतु सवंगणी केलेल्या उडीद पिकांचे ढीग पावसात भिजून सडत आहे. शेंगात कोंब फुटू लागले. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
या परिसरात यंदा आंतरपीक म्हणून उडीद पिकाला शेतकरी वर्गाने अधिक प्राधान्य दिले. मागील वर्षी उडदाला शासनाने १० ते १५ हजार रुपये भाव दिला. त्यामुळे शेतकरी वर्गाला उडीद पिकाचे वेड लागले. परंतु यावर्षी उडीद पीक कापणीला आल्यावर आलेल्या पावसामुळे उडीद पीक संकटात सापडले. या वर्षी मात्र परिसरात उडीदाची पेरणी अधिक आहे. उत्पादन अधिक झाल्याने पिकाला भाव सुद्धा कमी आहे. ५ ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव सध्यस्थितीत आहे. सध्या उडीदाची सवंगणी सुरू आहे. मात्र पावसामुळे कापलेले पीक जमा करण्यास सवड मिळाली नाही. भिजलेल्या उडदाला कोंब फुटत आहे. परिसरातील नाचोना, खुर्माबाद, इटकी, अंतरगाव माहुली, कान्होली येथे कमी अधिक प्रमाणात उडदाची हीच स्थिती आहे. येथे मेळघाटातील मजूर काम करण्यासाठी दाखल होत असतो. सधन शेतकऱ्यांनी बाहेर गावावरुन मजूर आणून शेतीची काम करीत आहे. परंतु अल्पभूधारक शेतकरी हा पावसाच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. (वार्ताहर)