‘त्या’ पाच सरपंच कुटुंबांना मदतीची प्रतीक्षा
By Admin | Updated: February 15, 2015 00:11 IST2015-02-15T00:11:27+5:302015-02-15T00:11:27+5:30
संपूर्ण आयुष्य गाव विकासासाठी अर्पण केल्यानंतर आजही ना शासनाने ना प्रशासनाने कोणतीही मदत देण्यासाठी पुढाकार घेतला नाही.

‘त्या’ पाच सरपंच कुटुंबांना मदतीची प्रतीक्षा
मोहन राऊत धामणगाव रेल्वे
संपूर्ण आयुष्य गाव विकासासाठी अर्पण केल्यानंतर आजही ना शासनाने ना प्रशासनाने कोणतीही मदत देण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्या पाचही सरपंचांच्या कुटुंबांतील सदस्य शासकीय मदतीसाठी लालफीतशाहीचा दरवाजा ठोठावत आहेत़ सर्वांनी दिलेले त्यावेळचे आश्वासन हवेतच विरले असल्याची खंत संबंधित कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे़
गत वर्षी याच तारखेला रात्री जळगाव येथे सरपंच परिषदेला जात असताना चिखलीजवळ स्कारपीओ गाडी झाडावर आदळली होती. यात जुना धामणगाव येथील सरपंच प्रवीण गुल्हाने, वाठोड्याचे सरपंच नरेंद्र बहुरूपी, ढाकुलगावचे सरपंच मंगेश म्हात्रे व गुंजी येथील रहिवासी अरूण टाले यांचा मृत्यू झाला.
तसेच जखमी झालेले झाडा येथील सरपंच अतुल कोंबे यांची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाल्यावरही कोणत्याच प्रकारची शासनाने मदत केलेली नाही.
तालुक्यातील चारही सरपंचांचा संसाराचा गाडा केवळ शेतीच्या भरवशावर चालत होता़ ग्रामपंचायतीमधील पाणी पुरवठ्याचे थकीत वीज बिल भरले नाही तर दुसऱ्या दिवशी गावातील वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे वेळप्रसंगी उसणवारीचे पैसे घेऊन वीज देयके भरण्यासाठी या सरपंचासह गुंजी येथील मृत अरूण टाले यांचा पुढाकार राहत असत.
घरावर तुळशीपत्र ठेवून गावाच्या विकासासाठी धावणारे व्यक्तिमत्त्व म्हणून तालुक्यात या पाचही गावांतील मृत सरपंचांची ओळख होती़ आजघडीला त्यांचेच कुटुंब मदतीपासून वंचित आहेत.