दीड महिन्यांत तापाचे ३ हजार रुग्ण; ५३१ टायफाईडचे 'पॉझिटिव्ह'
By Admin | Updated: July 22, 2015 00:33 IST2015-07-22T00:33:21+5:302015-07-22T00:33:21+5:30
हवामानाच्या असंतुलनामुळे जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल घडून आला आहे.

दीड महिन्यांत तापाचे ३ हजार रुग्ण; ५३१ टायफाईडचे 'पॉझिटिव्ह'
अमरावती : हवामानाच्या असंतुलनामुळे जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल घडून आला आहे. परिणामी जिल्ह्यातील रोगराई वाढली असून दीड महिन्यातच तापाचे तब्बल तीन हजार रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यातच दाखल रुग्णांपैकी ५३१ रुग्ण तायफाईडचे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नागरिकांनी दूषित पाण्याचा वापर टाळणे व डांसाचा प्रादुर्भाव रोखण्याचे प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.
दरवर्षीच पावसाळ्यात जिल्ह्यात रोगराईचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. पावसामुळे पाणी स्त्रोत दूषित होऊन ते पाणी नागरिकांच्या पिण्यात येते. त्यातच अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डांसाचा प्रादुर्भावसुध्दा मोठ्या प्रमाणात वाढतो. परिणामी रोगराई वाढल्याचे आढळून येते.
यंदा पावसाळा सुरु झाल्यावर दमदार पावसाने हजेरी लावली, मात्र, मध्यंतरी पावसाने २५ दिवसांची प्रदीर्घ दडी मारल्याने वातावरणात बदल झाला आहे. १ जून ते १२ जुलैदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात तापाचे तब्बल ३ हजार रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी १ हजार २३५ रुग्णांची मलेरियाची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, त्यामध्ये पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले नाहीत. तसेच तापाच्या १ हजार २८९ रुग्णांच्या रक्तनमुन्याची टायफाईडची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये तब्बल ५३१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या शासकीय आकडेवारीवरून जिल्ह्यातील तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्याा प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच तापाने दोन ते तीन रुग्ण दगावल्याची माहिती इर्विन रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)