‘ते’ बारुद गँगचे सदस्य
By Admin | Updated: August 14, 2015 00:51 IST2015-08-14T00:51:55+5:302015-08-14T00:51:55+5:30
रेती तस्करांच्या हल्ल्यात नाहक बळी पडलेल्या अमित बटाऊवाले या तरुणाच्या खुनानंतर कमालीची संतापलेली जुळी नगरी एव्हाना शांत वाटत असली तरी लोकमनातील खदखद कायमच आहे.

‘ते’ बारुद गँगचे सदस्य
अचलपुरात खदखद : खुन्यांना अटक केव्हा?, पोलिसांचे होते छुपे बळ
अमरावती/अचलपूर : रेती तस्करांच्या हल्ल्यात नाहक बळी पडलेल्या अमित बटाऊवाले या तरुणाच्या खुनानंतर कमालीची संतापलेली जुळी नगरी एव्हाना शांत वाटत असली तरी लोकमनातील खदखद कायमच आहे. हत्येच्या आरोपींची अचलपूर, परतवाडा शहरात ‘बारुद गँग’ असून त्याद्वारे ते दहशत निर्माण करीत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.
'गुंडाराज' भासावा याप्रमाणे भरदिवसा शस्त्राने भोसकून तरुण अमितला ठार मारणाऱ्या तमाम खुन्यांना अचलपूर पोलीस कधी अटक करणार, असा संतप्त सवाल अचलपूर-परतवाडा या जुळ्या नगरीत विचारला जात आहे. या आरोपींना अचलपूर पोलिसांचे छुपे बळ होते, अशी लोकभावना आता जुळ्या नगरीतील चौकाचौकांत व्यक्त होऊ लागली आहे.
रेती तस्करीतून उद्भवलेल्या वादात नियोजनबध्द पद्धतीने बटाऊवाले पिता-पुत्रावर हल्ला करून अमितचा बळी घेणाऱ्या आरोपींमध्ये कुख्यात व सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यांच्यावर यापूर्वीदेखील गुन्हे दाखल आहेत. रेती तस्करीच्या मुद्यावरून बटाऊवाले कुटुंब आणि आरोपींमध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. तस्करांच्या मनमानीला कंटाळलेल्या मोहन बटाऊवाले यांनी यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारीदेखील केल्या होत्या. रेती तस्करांपासून जिवाला असलेला धोका बटाऊवाले कुटुंबीयांना बऱ्याच दिवसांपासून जाणवत होता. शेवटी रेती तस्करांनी अमितचा बळी घेतलाच.
यापूर्वीचे गुन्हे : दंगली भडकविणे, अवैध शस्त्र बाळगणे, हल्ला करणे
परतवाडा -अचलपूर शहरांतील विशिष्ट समाजाचे नेतृत्व स्वत:कडे ठेवण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण झाल्यास तिला खतपाणी देण्यात पुढाकार घेणे, असे कार्य या बारुद गँगचे होते. तसे गुन्हेही या आरोपींवर दाखल आहेत. २००७ मध्ये अचलपूर शहरात जातीय दंगल उसळली होती, त्यावेळी या आरोपींपैकी काहींवर पोलीस दप्तरी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंजनगाव येथे अवैधरीत्या शस्त्र बाळगण्याचे, परतवाडा येथील हॉटेल व्यावसायी प्रकाश मुंदे यांना हॉटेलात मारहाण केल्याचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे अमितच्या मारेकऱ्यांवर दाखल आहेत.
रेती, गुटखा, रॉकेल तस्करी
अचलपूर शहरातील ‘बारुद गँग’चे २०पेक्षा अधिक सदस्य असून एकाच परिवारातील
१० ते १२ सदस्य या टोळीत असल्याची सूत्राची माहिती आहे. अलीकडच्या काळात रेती तस्करी हा या गँगचा मोठा व्यवसाय झाला होता. अवैध गुटखा विक्री, रॉकेलची अवैध विक्रीसुध्दा ही ‘बारुद गँग’ करीत होती. रेती तस्करीसाठी ठिकठिकाणी हप्ते दिले जात असल्याने त्यांची मुजोरी व दादागिरी बेलगाम होती, अशी चर्चा तोंडोतोंडी आहे.
मुलींची छेड काढणाऱ्यांना मदत
‘बारुद गँग’ नामक युवकांची टोळी दहशत पसरविण्यासोबत मुलींची छेड काढणाऱ्या युवकांनासुध्दा मदत करीत असे, असा गंभीर आरोप अमितच्या मारेकऱ्यांवर जुळ्या नगरीतील नागरिक करीत आहेत. अमितच्या हत्येनंतर घराघरांत आता याच मुद्दाची चर्चा होत आहे. आरोपींची दहशत आणि त्यासंबंधीचे किस्से सर्वत्र चर्चिले जात आहेत. आरोपींविरुद्ध मोठा रोष जुळ्या नगरीत आहे. फरार आरोपी त्यांच्या गुन्हेगारी कारवायांचा हिसका दाखवतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
बजरंग दल देणार आज निवेदन
अचलपूर शहरातील घटनेनंतर शुक्रवारी बजरंगदलातर्फे परतवाडा-अचलपूर शहर बंद करण्याचे निवेदन देण्यात आले होते. मात्र आता शुक्रवारी परतवाडा शहरातील वाघामाता मंदिर संस्थान येथे बजरंग दलाचे २०० च्यावर कार्यकर्ते एकत्र येऊन सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकाऱ्यांना एक निवेदन देणार असल्याची माहिती आहे. जुळ्या नगरीत बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला, अशी माहिती बजरंग दलाचे अचलपूर जिल्हा संयोजक पवन जडीये यांनी दिली.
अधिकाऱ्यांना तगडा हप्ता
अमरावती/अचलपूर : हे अघटीत घडू शकणार असल्याची कुणकुण बटाऊवाले कुटुंबीयांना लागू शकते, तशी तक्रारही ते प्रशासनाला करतात, रेती तस्करी केलीच जात होती, असा भरवसा सारा गाव देतो, मग पोलीस प्रशासनाला हे का कळू नये? या संपूर्ण कालावधीत अचलपूरच्या ठाणेदारांची, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची हेर यंत्रणा काय करीत होती? अचलपूर संवेदनशील गाव असल्याचे अवघ्या अमरावती जिल्ह्याला माहिती आहे. अचलपूर पोलिसांच्याही लेखी ही माहिती असेलच. दोन धर्मांचे लोक या प्रकरणात सहभागी असल्याचे स्पष्ट असूनही अचलपूर पोलिसांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाय का योजिले नाहीत? अमितचा जीव वाचविण्याच्या दिशेने पाऊले का उचलली नाहीत. रेतीच्या तस्करीबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत करण्यात आली होती. याचाच अर्थ असा की, हे प्रकरण बरेच ताणले गेले होते. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी तरीही याप्रकरणी ठोस उपाययोजना केली नाही.
या रेती तस्करांकडून अचलपूर-परतवाड्यातील जबाबदार अधिकारी मोठ्या प्रमाणावर हप्ता वसुली करीत होते. त्यामुळे आरोपींना रान मोकळे झाले होते. या तमाम प्रकरणाची चौकशी गृहमंत्र्यांनी करावी आणि सर्व दोषी ‘लाभार्थी’ अधिकाऱ्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी सामान्य जनता करु लागली आहे. प्रशासन, शासनाने घटनेचे गांभीर्य न ओळखल्यास नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. (प्रतिनिधी)
ठाणेदारावर कारवाई का नाही?
दिवसाढवळ्या अमित मारला गेला. प्रकरण अचानक घडलेले नाही. प्रशासन याबाबत अवगत होते. संवेदनशील गावात घडलेला हा प्रकार कायदा व सुव्यवस्था ऱ्हास पावल्याचे ज्वलंत उदाहरण होय. ठाणेदार सी.एम. बहादुरे यांच्यावर कारवाई कधी होणार, असा सवाल जागृक नागरिक विचारत आहेत.
पोलिसांनी वेळेवर आवळल्या नाही मुसक्या
अमित बटाऊवाले व मोहन बटाऊवाले यांच्यावर हल्ला करणाऱ्या शरीक रहेमान, नासीर हुसेन, मो. शाबाद मो. वाजीद, मो. शाकीर, मो. आबीद बादशाह, मो. माजीद, सह आदि आरोपी रेती तस्करी करीत असल्याच्या अनेक तक्रारी मोहन बटाऊवाले यांनी जिल्हा प्रशासन व महसूल मंत्र्यांपर्यंत पोहचविल्या होत्या. तरीसुध्दा पोलीस व महसूल प्रशासनाने त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई न केल्याने या रेती तस्करांची हिंमत वाढली. त्यातूनच ही भयंकर घटना घडल्याची बाब आता स्पष्ट झाली आहे.