ग्रामीण भागात संचारबंदी नाही का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:01 IST2020-04-17T05:00:00+5:302020-04-17T05:01:06+5:30
अमरावती शहरासह इतर तालुक्यांच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी टाळण्याकरिता आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस प्रशासन प्रयत्नरत आहे. जर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी व्यतिरीक्त दुपारी २ नंतर विनाकारण घराबाहेर पडले तर कारवाई केली जात आहे. थेट गुन्हा नोंदविला जात आहे. तोंडाला मास्क न लावता घराबाहेर पडणे, रस्त्यांवर थुंकणे यासंदर्भातही कारवाई केली जात आहे.

ग्रामीण भागात संचारबंदी नाही का?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तीन आठवड्यांपासून देशात लॉकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ३ मे पर्यंत ते कायम राहणार आहे. मात्र, जिल्ह्यात फक्त संचारबंदीची अंमलबजावणी खऱ्याअर्थाने अमरावती शहर व १४ तालुक्यांतील शहरातच होताना दिसत आहे. ग्रामीण भागात अद्यापही नाका-तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग ठेवणे, एकाच ठिकाणी गर्दी न करणे या बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात संचारबंदी नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अमरावती शहरासह इतर तालुक्यांच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी टाळण्याकरिता आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस प्रशासन प्रयत्नरत आहे. जर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी व्यतिरीक्त दुपारी २ नंतर विनाकारण घराबाहेर पडले तर कारवाई केली जात आहे. थेट गुन्हा नोंदविला जात आहे. तोंडाला मास्क न लावता घराबाहेर पडणे, रस्त्यांवर थुंकणे यासंदर्भातही कारवाई केली जात आहे. त्याकारिता शहरात ४८ ठिकाणी, तर ग्रामीण पोलिसांनी १७ ठिकाणी नाकेबंदी पॉर्इंट लावून कारवाई केली जात आहे. प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक गावात मात्र, संबंधित पोलीस कर्मचारी फारशी गस्त घालत नाहीत, नागरिकांवर ग्रामपंचायतीमार्फतही कारवार्इंचा बडगा उगारला जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागात ‘कोरोना’विषयी नागरिक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या दिवसरात्र चौकात एकत्र येऊन चर्चा झडत आहेत. तोंडाला मास्क न लावता व ‘सोशल डिस्टंसिंग’ न ठेवता बिनधास्त वागत आहेत. त्यामुळे संचारबंदीचा अर्थच ग्रामीण नागरिकांना समजावून सांगण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांंनी एकदा ग्रामीण भागात गस्त घातली तरी संचारबंदीचा धाक नागरिकांमध्ये दिसून येईल. सध्या ग्रामीण भागात एकही कोरोनाबाधित आढळला नसला तरी सर्तकतेच्या दृष्टीने संचारबंदी पाळणे गरजेचे आहे. वैद्यकीय कारणास्त वा जीवनावश्यक वस्तूंच्या ठोकची खरेदीकरिता काही नागरिक शहरात जाऊन येतात. तसेच अनेक मुले-मुली मोठ्या शहरातून सध्या घरी परतले आहे. अनेकांचा होम क्वारंटाईन कालावधी संपुष्टात आला असला तरी शासनाने दिलेल्या गाईडलाईनचे पालन करणे गरजेचे आहे. प्रतिनिधीने दर्यापूर तालुक्यातील गायवाडी, शिंगणवाडी, कळाशी, आमला व भातकुली तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या असता, हे दृश्य पहायला मिळाले.
ग्रामीण भागात मुख्य ठिकाणी १९ नाकेबंदी पॉइंट आहेत. ग्रामीण पोलीस ठाण्यात एकच वाहन असते. गावपातळीवर पोलीस आल्यास नागरिक घरात जातात. पोलीस निघून गेल्यानंतर परत बाहेर येतात. गावागावांत पोलीस गस्त घालत आहेत.तसे आढळल्यास कारवाई केली जाईल.
- हरिबालाजी एन.
जिल्हा पोलीस अधीक्षक