महसूल विभागाच्या एकाही अधिकाऱ्यावर कारवाई नाही
By Admin | Updated: August 27, 2015 00:29 IST2015-08-27T00:29:36+5:302015-08-27T00:29:36+5:30
रेती तस्करांविरुध्द लढा देत असताना मोहन बटाऊवाल्यांना आपल्या मुलाची हत्या होत असताना उघड्या डोळ्यांनी बघावे लागले.

महसूल विभागाच्या एकाही अधिकाऱ्यावर कारवाई नाही
वडिलांसमोर झाली मुलाची हत्या : तहसीलदाराच्या पाठीशी कोण?
अमरावती /अचलपूर : रेती तस्करांविरुध्द लढा देत असताना मोहन बटाऊवाल्यांना आपल्या मुलाची हत्या होत असताना उघड्या डोळ्यांनी बघावे लागले. गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या पायांना अपंगत्व आले. या घटनेची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अचलपूर, परतवाडा व सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या तडकाफडकी बदल्या केल्यात. परंतु या घटनेसाठी खऱ्या अर्थाने जबाबदार असलेल्या महसूल विभागाच्या एकाही अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई झाली नाही.
रेती तस्करांचे ट्रॅक्टर शेतातून जात असल्याने पिकांची नासाडी होत होती. त्यामुळे वाळू तस्करांच्या विरोधात विलायतपुऱ्यातील रहिवासी मोहन बटाऊवाले यांनी एल्गार पुकराला होता. कित्येकदा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरुन माहिती दिली. परंतु संबंधित अधिकारी देखाव्यापुरती कारवाई करीत होते. आपण वाळू तस्करांविरुध्द कडक कारवाई केली होती, असे म्हणून ते स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. महसूल विभागाने लाखो रुपयांचा महसूल गोळा केला असला तरी कोट्यवधी रूपयांची वाळू चोरी झाली त्याचे काय?, असे लोकांचे म्हणणे आहे.
वाळू चोरीमध्ये कोणत्या लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते सहभागी होते, हे सर्वश्रुत आहे. रेती तस्करी रोखण्याची खरी जबाबदारी महसूल विभागाची आहे.
मंडळ अधिकारी प्रभारी
अचलपूर-परतवाड्यात बिनदिक्कत रेती तस्करी होत असताना शहरातील मंडळ अधिकारी अनिल पोटे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता. येथील मंडळ अधिकारी सोनल फुंदे या गेल्या वर्षभरापासून पुणे येथे ट्रेनिंगला गेल्या आहेत. वास्तविक येथे कायमस्वरुपी मंडळ अधिकाऱ्याची गरज आहे. मात्र, येथे प्रभारी अधिकारी नेमण्यात आला. येथे कर्तव्यदक्ष व प्रामाणिक मंडळ अधिकारी नेमावा, अशी जनतेची जोेरदार मागणी आहे.
लवकरच झाली उचलबांगडी
दोन वर्षांपूर्वी अचलपूर येथे सुधीर राठोड तहसीलदार म्हणून आले होते. त्यांच्या कार्यकाळात गौणखनिजाची तस्करी, अवैध कामांना ब्रेक लागला होता. त्यामुळे भ्रष्ट नेते मंडळीमध्ये त्यांच्या विरोधात असंतोष असला तरी सामान्य जनता त्यांच्या कामाबद्दल कमालीची समाधानी होती. पण, एका लोकप्रतिनिधीने मुंबईपर्यंत राजकीय वजन खर्च करुन त्यांची येथून बदली केली.
वाळू तस्करांविरुध्द २०१३-१४ मध्ये १३८ प्रकरणात कारवाई करण्यात आली. १ लाख ९६ हजार ५६५ रुपये दंड वसूल केला. २०१५ मध्ये १५ मार्चपर्यंत एकूण २०३ प्रकरणी कारवाई करण्यात आली तर २०१५-१६ या आर्थिक वर्षात परतवाडा २, अचलपूर ३, आसेगाव येथे पाच कारवाया झाल्यात.
-मनोज लोणारकर, तहसीलदार
रेती तस्करीसंबंधी आम्ही जिल्हाधिकारी व आयुक्तांकडेही लेखी तक्रारी केल्या होत्या. पण, उपयोग होत नव्हता. हा प्रकार रोखला असता तर अमित ची हत्या झाली नसती. त्याच्या हत्येस तहसीलदारच जबाबदार आहेत. परंतु अजूनही त्यांचेवर कोणतीच कारवाई नाही.
-अमोल गोहाड
अध्यक्ष, युवा गर्जना संघटना