जिल्ह्यात ४०० महिला पोलिसांची होतेय परवड
By Admin | Updated: October 17, 2015 00:15 IST2015-10-17T00:15:04+5:302015-10-17T00:15:04+5:30
आदिशक्तीच्या आराधनेचे पर्व साजरे होत असताना कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवणाऱ्या ४०० वरदायिनींची (महिला पोलीस)...

जिल्ह्यात ४०० महिला पोलिसांची होतेय परवड
प्रसाधनगृहांची वानवा : सेवेदरम्यान होतात हाल
धामणगाव रेल्वे : आदिशक्तीच्या आराधनेचे पर्व साजरे होत असताना कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवणाऱ्या ४०० वरदायिनींची (महिला पोलीस) परवड होत असून बारा-बारा तास सेवा देत असताना त्यांच्यासाठी अगदी साध्या सुविधाही उपलब्ध नाहीत. स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने सेवेदरम्यान या महिला पोलिसांचे प्रचंड हाल होत आहेत.
गणेशोत्सव संपला. पितृपक्षही आटोपला आणि आता नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. उत्सवांदरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी पुरूषांच्या बरोबरीने महिला पोलीसही कार्यरत आहेत. अमरावती शहर व ग्रामीण भागातील २९ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस जागरूकतेने ही जबाबदारी पार पाडत आहेत. शेकडो दुर्गामंडळांच्या पंडालांसमोर पुरूषांच्या बरोबरीने महिला पोलीसही नियुक्त केले आहेत.बंदोबस्ताच्या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने महिला पोलीस आणि महिला होमगार्डसची कुचंबणा होत आहे. कित्येकदा या महिला कर्मचाऱ्यांना आसपासच्या घरांच्या स्वच्छतागृहाचा आश्रय घ्यावा लागतो. पण, ज्या ठिकाणी ही सोयदेखील नाही, तेथे काय करावे, असा प्रश्न पडतोच. महिला पोलिसांना मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा अनेक दिवसांपासून दुर्लक्षितच आहे.
फिरत्या स्वच्छतागृहाची गरज
शहरात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी व होमगाडर््सची अडचण ओळखून ठिकठिकाणी पोलीस विभागाने मोबाईल प्रसाधनगृहे उभारावीत, अशी मागणी केली जात आहे.
सण-उत्सवांच्या काळात महिला पोलीस कर्मचाऱ्यांची सर्वाधिक गैरसोय होते़ त्यांना १२ तास सेवा द्यावी लागते़ त्यांच्या रजा रद्द होतात. बंदोबस्ताच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहासह अन्य काही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे कोणतेही नियोजन नाही़ त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेऊन मोबाईल स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे.
-महिला पोलीस कर्मचारी