लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उद्धव ठाकरे यांचे नाशिक, परभणी व धाराशिवमध्ये खासदार निवडून आले, तेव्हा त्यांच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकले होते. त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पायदळी तुडविले. मतांच्या लांगुलचालनासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे 'औरंगजेब फॅन्स क्लब'चे सदस्य झाल्याचे मी म्हटले होते. पुढच्या काळात ते या क्लबचे अध्यक्ष होतील, अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली.
ज्या दिवशी काँग्रेससोबत जावे लागेल, त्या दिवशी मी माझ्या शिवसेनेचे दुकान बंद करेन, असे बाळासाहेब म्हणाले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मतांसाठी हिंदू धर्माचा, भगव्या ध्वजाचा विचार सोडला. संजय राऊत यांचे बोलणे मला ऐकू येत नाही व महाराष्ट्रातील जनतेनी त्यांचे ऐकणे सोडले आहे. त्यामुळे संजय राऊत या विषयावर बोलण्यात काही अर्थ नसल्याचे बावनकुळे म्हणाले. दिशा सालियन प्रकरणात त्यांच्या वडिलांनी तक्रार नोंदविली आहे, जोपर्यंत पोलिस अंतिम निष्कर्षावर येत नाहीत, तोपर्यंत या विषयावर बोलणे योग्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण तायडे, आमदार केवलराम काळे. माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील उपस्थित होते.
रायगड पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच निकालीसन २०४७ पर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला राज्यात व देशात वाव नाही. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षातच राहावे, यासाठी त्यांना शुभेच्छा देत असल्याचे बावनकुळे म्हणाले. रायगड येथील पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांची लवकरच बैठक होणार आहे. मीही बैठकीत असणार आहे. अधिवेशनामुळे बैठक लांबल्याचे ते म्हणाले. संभाजी भिडे व प्रकाश आंबेडकर यांनी काय म्हटले, यापेक्षा देशाचा इतिहास, संस्कृती काय म्हणते, ते महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.