दहावी, बारावी परीक्षा होणार ऑफलाईन, पालकांची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:18 IST2021-02-26T04:18:11+5:302021-02-26T04:18:11+5:30
अमरावती : दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. ...

दहावी, बारावी परीक्षा होणार ऑफलाईन, पालकांची चिंता वाढली
अमरावती : दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना केद्रावर जाऊन पेपर द्यावा लागणार आहे. मात्र, गत १५ दिवसांपासून कोरोना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा ‘हॉट स्पॉट’ ठरत आहे. तर, विद्यार्थ्यांच्या पालकांत कमालीची भिती पसरली असून, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
राज्यात सध्या कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा एप्रिलमध्ये होण्याचे संकेत आहे. कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने आढावा घेतला. त्यावेळेस ऑनलाईन परीक्षा घेऊन शकतो का, यावर चर्चा करण्यात आली. दरम्यान राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यासंदर्भात पूर्णपणे तयार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, ग्रामीण भागात ईंटरनेट कनेक्टिव्हीटीची समस्या असल्याने ऑनलाईन परीक्षा घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फटका बसू शकतो. त्यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना केंद्रावर जाऊन ऑफलाईन परीक्षा द्यावी लागणार असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांत चितेचे सावट निर्माण झाले आहे. ऑफलाईन परीक्षांसाठी शिक्षण मंडळाने तयारी चालविली आहे.
----------------------
परीक्षेचे असे आहे संभाव्य वेळापत्रक
दहावीची परीक्षा- २१ एप्रिल ते २० मे
बारावीची परीक्षा- २९ एप्रिल ते २१ मे
विभागात विद्यार्थी संख्या-
दहावी- १ लाख ६५ हजार
बारावी- १ लाख ५० हजार
----------------------
दहावीतील विद्यार्थ्यांचा पालकांना काय वाटते?
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. अशातच शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा केंद्रावर घेतल्यास कोरोना संसर्ग वाढीस वाव मिळणार आहे. त्यामुळे शासनाने परीक्षांसाठी पर्यायांचा विचार करावा.
- राजकन्या चवरे, पालक
----------------------
केंद्रात होणाऱ्या गर्दीतून विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग होण्याची दाट शकयता आहे. सुविधा असल्या तरी आमचा पाल्य सुरक्षित राहीलच, याची कात्री मुळीच नसल्याने आमची चिंता वाढली आहे.
- निर्मला कावरे, पालक
--------------------------
दहावीच्या परीक्षेला हजारो विद्यार्थी बसणार आहेत. ते केंद्रावर येताच गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढीस मदत होणार नाही का? असा आमचा सवाल आहे.
- सुरेश पवार, पालक.
-------------------
बारावीतील विद्यार्थ्यांचा पालकांना काय वाटते?
सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, ऑफलाईन परीक्षा घेणे कठीण होणार आहे. विद्यार्थी, पालकांमध्ये कोरोनाची भिती कायम आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेऊन विद्यार्थ्याच्या आराेग्याची काळजी घ्यावी.
- माणिक कुळकर्णी, पालक..
वाढत्या कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. आता पुन्हा कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका नाही का.
- प्रभाकर ईंगोले, पालक,
कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी असून, लग्नात २५ व्यक्तिंनाच सहभागी होण्याची परवानगी आहे. अशात परीक्षांच्या वेळी गर्दीमुळे कोरोना वाढणार नाही का, हा प्रश्न आहे.
- संतोष पाटील, पालक,