तेंदू, मोहा संकलन क्षेत्रात सर्वाधिक वणवा, वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:12 IST2021-04-12T04:12:26+5:302021-04-12T04:12:26+5:30
अमरावती : राखीव वने, संरक्षित वनांत उन्हाळी हंगामात तेंदू, मोहा, गौण वनोपज संकलन क्षेत्रात सर्वाधिक वणवा लागत असल्याचे सर्वेक्षणातून ...

तेंदू, मोहा संकलन क्षेत्रात सर्वाधिक वणवा, वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची पाठ
अमरावती : राखीव वने, संरक्षित वनांत उन्हाळी हंगामात तेंदू, मोहा, गौण वनोपज संकलन क्षेत्रात सर्वाधिक वणवा लागत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. मार्च, एप्रिल या दोन महिन्यांत वणवा लागत असल्याने वनविभागाने नव्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या आहेत. मात्र, वणव्याच्या ठिकाणी वरिष्ठांनी भेटी दिल्या नसल्याची माहिती आहे.
यंदा संपूर्ण विदर्भातील जंगलक्षेत्रात वणवा पेटला आहे. ८ एप्रिल रोजी नवेगाव बांध-नागझिरा अभयारण्य व पिटेझरी वनपरिक्षेत्रात अज्ञाताने आग लावली. ही आग विझविताना हंगाणी तीन वनमजूर होरपळून दगावले, तर दोन मजूर गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर पुन्हा जंगलातील वणवा ऐरणीवर आला आहे. वणवा लागणे ही बाब वनविभागासाठी काही नवीन नाही. मात्र, वणवा नियंत्रणासाठी सक्षम उपाययोजना आहे का, याबाबत वरिष्ठांनी मंथन करणे काळाची गरज आहे. उन्हाळी हंगाम सुरू झाला की, नागपूर येथील वातानुकूलित कार्यालयातून वणवा नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासाठी परिपत्रक जारी केले जाते. मात्र, खऱ्या अर्थाने जंगलक्षेत्र, व्याघ्र प्रकल्प, संरक्षित क्षेत्रात वणवा नियंत्रणासाठी जिवाचे रान करणारे वनपाल, वनरक्षक, वनमजूर, हंगामी मजूर यांची काळजी कशी, कोण घेणार, याबाबत वनविभागात उपाययोजनांवर भर दिला जात नाही. त्यामुळे नवेगाव बांध येथे वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) संजीव गौड यांनी ८ एप्रिल रोजी परिपत्रक काढून वणव्यावर उपाययोजना करण्याबाबत कळविले आहे. जंगल क्षेत्रात वणवा लागल्यास पोलीस, अग्निशमन विभागाची मदत घेण्याचे या परित्रकात म्हटले आहे.
-----------------
विदर्भातील वणव्याच्या ठिकाणी वरिष्ठांनी भेटी दिल्या का?
विदर्भात फेब्रुवारीपासून वणवा पेटला आहे. मेळघाट, चंद्रपूर, टिपेश्वर, काटेपूर्णा, लोणार, अमरावतीनजीकचे पोहरा, भानखेडा जंगल, अकोला, अकोट, मोर्शी, वरूड आदी ठिकाणी वणवा सुरू आहे. आता केवळ दोन ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पाऊस पडल्याने वणवा दिसून येत नाही. मात्र, यंदा हंगामात पेटलेला वणवा आणि घटनास्थळी नुकसानाची पाहणी करण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठांनी भेटी दिल्यात, हे शोधून काढल्यास वातानुकूलित केबिनमध्ये बसून आदेश काढणे आणि जंगलात वणवा विझविताना मजुरांना काय कसरत करावी लागते, हे स्पष्ट होईल.