मध्यवर्ती कारागृहाची सागवान झाडे बेवारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 05:00 AM2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:01:25+5:30
मध्यवर्ती कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या सागवान झाडांच्या भागातून राष्ट्रीय महामार्ग वळण रस्ता गेला. त्यामुळे या वळण रस्त्याच्या निर्मितीसाठी कारागृहाची जागा अधिग्रहीत करण्यात आली. टोलजंग सागवान झाडांमधून राष्ट्रीय वळण महामार्ग गेल्याने सागवानाची झाडे दोन टप्प्यात विभागल्या गेली. यात कारागृहाच्या मागील बाजूस आणि राष्ट्रीय महामार्ग वळण रस्त्यागलत अशा दोन भागांत ते विभागल्या गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहाच्या अधिनस्थ असलेले शेकडो सागवान झाडे बेवारस स्थितीत आहेत. त्यामुळे सागवान चोरट्यांकडून बुंध्यापासून ही झाडे चोरून नेण्यात येत आहेत. परिपक्व असलेल्या सागवान झाडांकडे कारागृह प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष चालविले आहे. स्थानिक दंत महाविद्यालय मार्गावर रात्रीला अंधार असल्याने चोरट्यांना सागवान झाडांची चोरी करणे सुकर होत आहे.
मध्यवर्ती कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या सागवान झाडांच्या भागातून राष्ट्रीय महामार्ग वळण रस्ता गेला. त्यामुळे या वळण रस्त्याच्या निर्मितीसाठी कारागृहाची जागा अधिग्रहीत करण्यात आली. टोलजंग सागवान झाडांमधून राष्ट्रीय वळण महामार्ग गेल्याने सागवानाची झाडे दोन टप्प्यात विभागल्या गेली. यात कारागृहाच्या मागील बाजूस आणि राष्ट्रीय महामार्ग वळण रस्त्यागलत अशा दोन भागांत ते विभागल्या गेले. राष्ट्रीय वळण महामार्गलगत म्हणजे दंत महाविद्यालय मार्गावर मोठ्या प्रमाणात सागवानाची झाडे डौलात उभी आहेत. ही झाडे बेवारस स्थिती असल्यामुळे येथे कोणालाही सहजतेने प्रवेश करता येते. सागवान झाडांना संरक्षण कुंपण नसल्याने चोरट्यांचे फावत आहे.
आवाजरहित साहित्यांचा वापर
सागवानाची ती परिपक्व झाडे बेवारस असल्यामुळे रात्रीच्या वेळी ती सहजतेने कापून नेता येते. सागवानची झाडे कापण्यासाठी आवाजरहित अवजारे वापरली जातात. काही झाडांना दिवसा बुंध्याजवळ खचके मारून ती रात्रीला चोरून नेली जात आहे. हीच स्थिती असल्यास येथे सागवान झाडे नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही.
सुरक्षा व्यवस्था हटविली
सागवान वृक्षाच्या सुरक्षेसाठी तीन वर्षांपूर्वी कारागृह प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था प्रदान केली होती. या भागात टिनाची छोटीसी झोपडीसुद्धा उभारण्यात आली होती. तत्कालीन कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांच्या कारकिर्दीत या सागवान झाडांची निगा, देखभाल करण्यात आली. मात्र, त्यानंतर ती झाडे बेवारस झाल्याने आता हळूहळू चोरीस जात आहे.