शासनाच्या अशैक्षणिक कामाच्या ओझ्याने शिक्षक बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST2021-02-05T05:25:37+5:302021-02-05T05:25:37+5:30

विद्यादानाकडे दुर्लक्ष, ऑनलाइन कामे, शिष्यवृती माहिती संकलन अमरावती : जिल्हा परिषद शिक्षकांना शिकविण्यासोबतच अन्य कामांची जबाबदारी पार पाडावी लागते. ...

Teachers are fed up with the government's non-academic workload | शासनाच्या अशैक्षणिक कामाच्या ओझ्याने शिक्षक बेजार

शासनाच्या अशैक्षणिक कामाच्या ओझ्याने शिक्षक बेजार

विद्यादानाकडे दुर्लक्ष, ऑनलाइन कामे, शिष्यवृती माहिती संकलन

अमरावती : जिल्हा परिषद शिक्षकांना शिकविण्यासोबतच अन्य कामांची जबाबदारी पार पाडावी लागते. विद्यार्थ्याची माहिती ऑनलाइन भरणे, शिष्यवृत्ती माहिती संकलन करण्यासोबतच शालेय पोषण आहाराचे वाटपही करावे लागते. यामुळे कामाचे ओझे दिवसेंदिवस वाढत असल्याने या अतिरिक्त कामांमुळे शिक्षकांमधून ओरड होत आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लिपिक व स्वतंत्र मुख्याध्यापकाचे पद नसते. त्यामुळे शिक्षकांना शिकविण्यासोबतच शाळेतील इतर कार्यालयीन कामेही करावी लागत आहेत. याशिवाय सर्व विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन भरण्याची जबाबदारीही शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. शासनाकडून दिव्यांग, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी व अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्यांच्या पाल्यांकरिता शिष्यवृत्तीची योजना राबविली जाते. याबाबतची सर्व माहिती गोळा करून ती ऑनलाइन भरावी लागते. त्यानंतर ऑनलाइन माहिती ही पंचायत समितीकडे ऑफलाइन सादर करणे आवश्यक आहे. पोषण आहाराची कामे करावी लागतात. या सर्व अशैक्षणिक कामांसाठी विशेष करून जिल्हा परिषद शिक्षकांना जुंपले जात असून काम करण्यास नकार दिल्यास शासकीय सेवा-अटी, शर्तींचा भंग केल्याप्रकरणी कारवाईची धमकीही दिली जात आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये यासाठी शिक्षक संघटना मागील अनेक वर्षांपासून मागणी करीत आहेत. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही करण्यात आली. शासनाकडून आश्वासनाशिवाय काहीही केले जात नाही. शिक्षकांना बीएलओचे केंद्रस्तरीय अधिकारी काम तर वर्षानुवर्ष करावे लागत आहे. मतदार यादीचे काम झाले तर मतदार नोंदणी त्यानंतर ओळखपत्र वाटप, मतदार यादी अद्ययावतीकरण संपल्यानंतर मात्र निवडणुकीच्या कामासाठीही शिक्षकांनाच पुढे केले जाते. त्यामुळे महिनोंमहिने शिक्षक या कामांमध्ये गुंतून पडत असल्याने त्यांचे शाळेकडे दुर्लक्ष होत आहे. परंतु त्यांच्या गैरहजेरीमुळे विद्यार्थ्यांच्याही उपस्थितीवर परिणाम होत आहे. कधी कधी याच अशैक्षणिक कामांमुळे नैराश्य येऊन शिक्षकांकडूनच शाळांना दांडी मारण्याचे काम केले जाते. या सर्व बाबींचा फटका विद्यादानावर होत आहे.

बॉक्स

एक शिक्षकी शाळांचे नुकसान

शासनाच्या अशैक्षणिक कामांसाठी शिक्षकांची निवड करताना कोणतीही परिस्थिती लक्षात घेतली जात नाही. बऱ्याच वेळा एक शिक्षकी शाळेतील शिक्षकांना काम सोपविले जाते. जिल्ह्यात ३१ शाळा एक शिक्षकी आहेत. अशा शाळांमध्ये विद्यादान व अशैक्षणिक कामे करताना शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान केले जाते.

कोट

झेडपी शाळेच्या शिक्षकावर शिकविण्यापेक्षा अन्य कामे जास्त लादली जातात. आम्ही वारंवार ही अशैक्षणिक कामे रद्द करण्यासाठी मागणी केली आहे. विविध योजना राबविताना शासनाने अतिरिक्त मनुष्यबळ पुरवावे, झेडपी शाळांसाठी केंद्र स्तरावर लिपिकांची व्यवस्था करावी, मोठ्या शाळांमध्ये शिपाई पद असावे, ऑनलाइन माहिती सादर केल्यानंतर ऑफलाइनचा तगादा लावू नये.

- किरण पाटील,

उपाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ

कोट

शिक्षकांना शिक्षणाव्यक्तिरिक्त इतर कामे देण्यात येत नाहीत. जी कामे आहेत ती शिक्षणपूरक कामे आहेत. सध्याचे युग नवतंत्रज्ञानाचे आहे. अनेक कामे ऑनलाइन होत आहेत. जसे विविध शिष्यवृत्तीचे अर्ज, परीक्षा अर्ज भरणे ही कामे करावी लागत असली तरी शिक्षणपूरक आहेत. शिक्षकांना अशैक्षणिक काम न देण्याचा प्रयत्न आहे.

- ई. झेड. खान,

शिक्षणाधिकारी प्राथमिक

बॉक्स

शासकीय योजनांचे ओझे

शिक्षकांना मतदार यादीचे काम कायमच दिले जाते. त्यात मतदार नोंदणी, छायाचित्रे गोळा करणे, यादी दुरुस्त करणे, मतदान चिठ्ठ्या वाटप करणे, मतदान प्रक्रिया पार पाडणे.

माहिती ऑनलाइन भरण्यासाठी शिक्षकांनाच स्वत: खर्च करावा लागतो. याकरिता शासनाकडून अनुदान दिले जात नाही.

कोरोनाच्या तीव्रतेच्या काळात शिक्षकांना चेक पोस्टवर ड्युटी बजावावी लागली. याशिवाय जनगणनेच्या कामासाठीही शिक्षक हा गावातील जणू हक्काचा कर्मचारी असतो. याकरिताही कामे करावी लागतात.

बॉक्स

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा - १,५८३

जिल्हा परिषद शिक्षक - ५,९६८

विद्यार्थी संख्या - १,०६,५०९

Web Title: Teachers are fed up with the government's non-academic workload

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.