चौकशी समितीचा ‘पीडीएमसी’तील गंभीर त्रुट्यांवर कटाक्ष
By Admin | Updated: June 4, 2017 00:08 IST2017-06-04T00:08:09+5:302017-06-04T00:08:09+5:30
नवजात चार शिशूंच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणाची चौकशी करीत असताना पाच सदस्यीय समितीने पीडीएमसी प्रशासनावर गंभीर ताशेरे ओढले.

चौकशी समितीचा ‘पीडीएमसी’तील गंभीर त्रुट्यांवर कटाक्ष
शिशू मृत्यू प्रकरण : अन्य डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नवजात चार शिशूंच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणाची चौकशी करीत असताना पाच सदस्यीय समितीने पीडीएमसी प्रशासनावर गंभीर ताशेरे ओढले. पीडीएमसी हे टेरिटरी केअर सेंटर असताना अशा त्रुट्या अपेक्षित नसून संबंधित सर्वांवर योग्य ती कार्यवाहीची शिफारस समितीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर चौकशी अहवालात केली आहे.
येथील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ‘पीडीएमसी’त रविवारी रात्री एकाचवेळी चार नवजात शिशूंचा मृत्यू झाला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली.
जिल्हा शल्यचिकित्सक अरुण राऊत, पॅथालॉजिस्ट व्ही.व्ही. जाधव, बालरोगतज्ज्ञ एन.जी. राऊत, आर.एस. नागलकर तथा कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ.के.बी.देशमुख यांचा त्यात समावेश होता. या समितीने ३० मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सुपूर्द केला.
एनआयसीयूचे दर आठवड्याला निजंतूकीकरण करणे अनिवार्य असताना प्रत्यक्षात १३ वेळा एनआयसीयूमध्ये फंगी’ असल्याचा अहवाल आहे. याबाबत संबंधित विभागप्रमुखांनी कुठलीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळे एनआयसीयूच्या प्रोटोकॉलचे निकष पाळण्यात आले नसल्याचे निरीक्षण समितीने नोंदविले. एनआयसीयू इन्फेक्शन कंट्रोल व्यवस्थितरीत्या व पूर्णपणे केली नसल्याची टिप्पणी समितीने केली आहे. संबंधित चारही बाळ नार्मल असताना ते गंभीर होत गेले. त्या काळात कोणत्याही डॉक्टरने त्यांना बघितले नाही. चारही नवजात बाळांचा मृत्यू २९ मे रोजी पहाटे २ ते ३ दरम्यान मृत्यू झाल्याचे मत या समितीने नोंदविले आहे. आफरिन बानो यांचे बाळ २९ मे रोजी पहाटे १२.१० वाजता, शिल्पा वेरुळकर यांचे बाळ पहाटे २.२० वाजता, माधुरी कावरे यांचे बाळ पहाटे २ वाजता, तर पूजा घरडे यांचे बाळ पहाटे २.३५ वाजता गंभीर झाल्याची नोंद केसपेपरवर घेण्यात आली. अर्थात या कालावधीत कोणत्याही डाक्टरांनी बघितले नसल्याचे समितीने म्हटले आहे. त्यापार्श्वभूमिवर पीडीएमसीतील अन्य डॉक्टरांची चौकशी होणार असून त्यातील काहींना सहआरोपी करण्याचे संकेत मिळाले आहेत.
कट्टा एनआयसीयू बाहेर
वस्तुस्थिती पाहता एनआयसीयुमध्ये २४ तास एका डॉक्टरने उपलब्ध राहणे अनिवार्य आहे. प्रत्यक्षात एका बाळाची प्रकृती गंभीर झाली तेव्हा ड्युटीवरील कट्टा उपस्थित नव्हते.त्यांना परिचारिकेने कळविल्यानंतर ते आले. यावरुन प्रथमदर्शनी नवजात बाळांच्या उपचारात निष्काळजीपणा दिसून येत असल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.