राहुट्या थाटल्या, पिंजरे सज्ज
By Admin | Updated: March 29, 2015 00:21 IST2015-03-29T00:21:10+5:302015-03-29T00:21:10+5:30
येथील चांदुररेल्वे मार्गावरील राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) ५०० क्वॉर्टर परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे.

राहुट्या थाटल्या, पिंजरे सज्ज
अमरावती : येथील चांदुररेल्वे मार्गावरील राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) ५०० क्वॉर्टर परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट आणि छाव्याचा मुक्तसंचार बघता त्यांना जेरबंद करण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी राहुटी (तंबू) थाटली असून दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. सर्च आॅपरेशन दरम्यान या परिसरात बिबट असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात स्पष्ट झाले आहे.
एसआरपीएफ क्वॉटर्सचा परिसर हा जंगलशेजारी आहे. दक्षिणेकडील वसाहतीमधील रहिवाशांना बिबट्यापासून धोका असल्याने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कर्मचारी कुटंबियांंनी केली आहे. एसआरपीएफ क्वॉटर्स परिसरातील श्रेष्ठता पार्क या भागात सर्वाधिक बिबट्याची दहशत असल्याने हा परिसर निर्मनुष्य आहे. याच भागातून बिबट आणि छावा शिकार व पाण्याच्या शोधार्थ येत असल्याचा कयास वनविभागाने बांधला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लोकांच्या मागणीनुसार उपवनसंरक्षक सोमराज यांनी परिसरात दोन राहुट्या थाटल्या आहेत.
समादेशकांचे वनविभागालापत्र
एसआरपीएफ परिसरात बिबट्याच्या दहशतीत कर्मचारी, अधिकारी वावरत आहेत. एसआरपीएफ बल गट क्र. ९ चे समादेशक सोळंके यांनी वनविभागाला पत्र दिले आहे. उपवनसंरक्षक नीनू सोमराज, वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी लाकडे यांनी या परिसरात गस्त वाढविल्याची माहिती आहे.