‘राजकोटवाला’मध्ये गचाळ जागेवर तयार होते मिठाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2016 00:09 IST2016-10-10T00:09:51+5:302016-10-10T00:09:51+5:30
शहरातील नामांकित हॉटेल्स, ्स्वीटमार्टमध्ये गणले जाणारे एक प्रतिष्ठान आहे.

‘राजकोटवाला’मध्ये गचाळ जागेवर तयार होते मिठाई
ग्राहकांचा विश्वासघात : आजारांचे संक्रमण रोखणार कसे ?
अमरावती : शहरातील नामांकित हॉटेल्स, ्स्वीटमार्टमध्ये गणले जाणारे एक प्रतिष्ठान आहे. जयस्तंभ चौकातील ‘राजकोटवाला स्वीट मार्ट व नमकीन’ आहे. येथून मोठ्या विश्वासाने मिठाई खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कल्पनाही नसेल की त्यांना विकले जाणारे पदार्थ किती गचाळ, अस्वच्छ आणि घाणेरड्या जागेत तयार केले जातात.
रविवारी 'लोकमत'च्या प्रतिनिधीने राजकोटवाला प्रतिष्ठानच्या खाद्यान्न तयार करण्याच्या जागेला भेट देऊन हा सगळा प्रकार कॅमेराबद्ध केला. जयस्तंभ चौकातील राठी कॉम्प्लेक्समध्ये ‘राजकोटवाला स्वीटमार्ट’ आहे.
या दुकानाच्या मागील मोकळ्या जागेत उघड्यावर पेढे, समोसे, शेव चिवडा, गुलाब जामून, रसगुल्ला व इतर अनेक पदार्थ तयार केले जातात. पदार्थ तयार केल्या जाणाऱ्या ठिकाणापासून अवघ्या फुटभर अंतरावर प्रचंड घाण साचलेली आहे. बुंदी ज्या ठिकाणी तयार करण्यात आली तेथून अवघ्या काही अंतरावर केरकचरा व प्लास्टिक पेटविण्यात आले होते. राख उडून बुंदीवर बसत होती. घाण झाडण्याचा खराटा बुंदीच्या तयार 'ट्रे'नजीक पडून होता. एकूणच सहज कुठल्याही आजाराचे संक्रमण होईल, अशी स्थिती होती. दरम्यान यासंदर्भात अन्न व औषधी प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळला नाही.
एफडीएचे नियम गुंडाळले
अमरावती : रसगुल्ल्याच्या उघड्या पाकावर माशा घोंगावत होत्या. हा सर्व नियमबाह्य प्रकार असून अन्न व सुरक्षा मानदे कायद्याचे उल्लंघन आहे. ‘नाव मोठे, लक्षण खोटे’ असाच प्रकार ‘राजकोटवाला’या नामांकित ‘स्वीट मार्ट’च्या संचालकांनी केला आहे.
ज्याठिकाणी अन्न पदार्थ तयार केले जातात, ती जागा स्वच्छ असावी, डोक्यात मास्क (कव्हर) घालूनच अन्न पदार्थ तयार करावेत, माशांचे संक्रमण टाळावे, हे नियम पाळणे गरजेचे असतानाही गरजेचे ‘राजकोटवाला’च्या संचालकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून अतिशय घाण व दुर्गंधीयुक्त जागेतच खाद्यपदार्थ तयार करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे नागरिकांनी काय खावे आणि कुणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता नागरिकांनीच पुढाकार घेऊन अन्नपदार्थ स्वच्छ जागेत तयार करण्यात येतात की नाही, याची शहानिशा करणे गरजेचे झाले आहे. अन्न पदार्थ, मिठाईमधून जिभेचे चोचले भागविणाऱ्या नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना आजारांचे संक्रमण झाल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती सद्यस्थितीतून दिसून येत आहे.
सांडपाणी साचलेल्या ठिकाणी चक्क खाद्यान्न तयार केले जात असेल तर आरोग्याची हमी घेणार कोण, हा प्रश्न यानिमित्ताने उपसिथत होतो. (प्रतिनिधी)
काय करते एफडीए ?
'लोकमतद्वारे पुराव्यानिशी अंबानगरीतील अनेक हॉटेल्समध्ये ढिसाळ कारभार सुरू असल्याची मालिकाच प्रकाशित केली जात आहे. तरीही ज्या एफडीएच्या अधिकाऱ्यांवर अमरावतीकरांचे आरोग्य जपण्याची व हॉटेलचालकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे, ते अधिकारी कोणतीही कारवाई करीत नाहीत. आता एफडीएच्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न अंबानगरीतील नागरिकांना सतावू लागला आहे.
सातुर्णा येथे खाद्य पदार्थ बनवितो. दसरा असल्याने प्रतिष्ठानाशेजारी खाद्यपदार्थ बनविले जात आहेत. स्वच्छतेची काळजी घेऊ.
- अनूज आडतिया,
संचालक राजकोटवाला.