शस्त्र परवाने सुसाट; जिल्ह्यात ७७० परवाने !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:38+5:302021-07-08T04:10:38+5:30
असाईनमेंट लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : स्वसंरक्षण आणि शेतीचे संरक्षण या दोन प्रमुख कारणांसाठी शस्त्रास्त्र परवाने देण्यात येतात. ...

शस्त्र परवाने सुसाट; जिल्ह्यात ७७० परवाने !
असाईनमेंट
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वसंरक्षण आणि शेतीचे संरक्षण या दोन प्रमुख कारणांसाठी शस्त्रास्त्र परवाने देण्यात येतात. यामध्ये शिवारात जंगली श्वापदांपासून वाचण्यासाठी सर्वाधिक परवाने काढण्यात आले आहेत. अमरावती शहर आयुक्तालयासह जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये एकूण ७७० परवाने नागरिकांनी काढले आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधी, व्यापारी, ठेकेदारांचा समावेश आहे. याशिवाय प्रतिष्ठित व्यक्ती आणि काही शेतकऱ्यांचाही समावेश आहे. अमरावती शहर आयुक्तालयाकडून ३९२ शस्त्र परवाने दिले गेले आहेत.
शस्त्रास्त्र परवाने मिळविणे अवघड आहे. त्याच पद्धतीने त्याचे संरक्षण करणेही तितकेच अवघड आहे. ही शस्त्रे बाळगताना शेती संरक्षणासाठी १२ बोअर बंदुकीला परवाना आहे, तर स्वसंरक्षणासाठी रिव्हाॅल्व्हर आणि पिस्टल यांचे परवाने देण्यात येतात. हे शस्त्र सार्वजनिक ठिकाणी काढता येत नाही. केवळ आत्मसंरक्षणासाठी शेवटचा पर्याय म्हणून या शस्त्रांचा वापर करता येतो.
पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतरच छाननी करून शस्त्रांचे परवाने देण्याबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतात. ज्या शस्त्राला परवाना मिळाला आहे, ते हरविता येत नाही. याशिवाय त्याचा दहशत पसरविण्यासाठी उपयोगही करता येत नाही. त्यामुळे अशा शस्त्रास्त्रांना जपून वापरावे लागते. गत पाच वर्षांत अनेक अर्ज आले. मात्र, प्रशासनाने सर्व बाबींची शहानिशा केल्यानंतर यातील बहुतांश अर्ज नाकारले आहेत. स्वसंरक्षण आणि शेतीसंरक्षण यासाठी या शस्त्रांना परवानगी आहे.
बॉक्स
शस्त्र परवाना काढायचा कसा?
परवाना काढताना जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासंदर्भातील ठोस असे कारण द्यावे लागते. त्यानंतर शस्त्रास्त्र का आवश्यक आहे, यावर सुनावणी होते. त्यानंतर विचारपूर्वकच परवाना दिला जातो.
------------
बाँक्स
धारणीमध्ये सर्वात जास्त परवाने
जिल्ह्यातील अमरावती, चांदूर रेल्वे, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी, धारणी व भातकुली या सात उपविभागांमध्ये परवान्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले. यानंतरही सर्व बाबींनी विचार आणि संपूर्ण प्रकरणाचे घटनाक्रम जाणून घेतल्यानंतरच परवाने देण्यात आले आहेत. अलीकडील काही वर्षांत परवाने वाटप थांबले आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक परवाने मिळविणाऱ्या विभागामध्ये धारणी आघाडीवर आहे. त्याखालोखाल अचलपूर विभागात शस्त्रास्त्र बाळगण्याचे परवाने आहे.
------------
कठोर नियमांमुळे नवीन परवाने थांबले
जिवाला धोका असणाऱ्या व्यक्तींना शस्त्रास्त्र बाळगण्याचे परवाने देताना प्रथमत: त्यांच्यावर खरेच हल्ला झाला होता का, याचा अहवाल घेतला जातो. यानंतर पोलीस विभागाकडून त्या प्रकरणात सुनावणी केली जाते. या सर्व बाबी तपासल्यानंतर जिल्हाधिकारी शस्त्रास्त्राचे परवाने दिले जातात.
------------
पाच वर्षांत मोजकेच परवाने
परवाना मागण्याचा अधिकार निवडक प्रकरणांतच देण्यात आला आहे. या अर्जानंतर संबंधित व्यक्तीला परवाना द्यायचा की नाही, याबाबत अधिकार जिल्हा प्रशासनाला आहेत. जिल्ह्यामध्ये त्याअनुषंगाने सुनावण्या झाल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्रास्त्रांचे परवाने नाकारले. यामुळे पाच वर्षात मोजक्याच परवान्यांना परवागी मिळाली आहे.
------------
शस्त्र सांभाळणे कठीण
१) शस्त्र सांभाळताना त्याचे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. याशिवाय त्याचा गैरवापर होणार नाही, याबाबतही कटाक्ष पाळण्याच्या सूचना देण्यात येतात.
२) परवाना दिलेल्या व्यक्तींना जितक्या बंदुकीच्या गोळ्या दिल्या आहेत, त्यांचा संपूर्ण अहवाल सादर करावा लागतो.
३) दर तीन वर्षांनी शस्त्र परवान्याचे नूतनीकरण करण्यात येते. यावेळी शस्त्राचा गैरवापर केल्याचे आढळल्यास अशा व्यक्तींचा परवाना रद्द करण्यात येतो. त्यांना पुन्हा कधीही शस्त्राचा परवाना मिळत नाही.
------------
विभागनिहाय परवान्यांची संख्या
अमरावती: ४
चांदूर रेल्वे : २०
अचलपूर : ८०
दर्यापूर : ४८
मोर्शी : ७१
धारणी : ११०
भातकुली : १०