सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:20 AM2021-05-05T04:20:48+5:302021-05-05T04:20:48+5:30

अमरावती : शहरात विनाकारण फिरत असलेल्या नागरिकांची आरटी-पीसीआर टेस्ट केली जात असतानाही अशा लोकांचे फिरणे बंद झालेले नाही. जीवनावश्यक ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

अमरावती : शहरात विनाकारण फिरत असलेल्या नागरिकांची आरटी-पीसीआर टेस्ट केली जात असतानाही अशा लोकांचे फिरणे बंद झालेले नाही. जीवनावश्यक वस्तू व मेडिसीनच्या नावावर अनेकांची शहरात अकारण भ्रमंती सुरू आहे. महापालिका व पोलिसांनी दखल घेणे गरजेचे आहे.

----------------------

परतवाड्यातील कृत्रिम पाणीपुरवठ्याला पालिका कारणीभूत

अमरावती : परतवाडा शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेकरिता चंद्रभागा धरणावर ९.१६१ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित केले गेले. यातील ६.१५० दलघमी पाण्याचा वापर नगर परिषदेने सुरू केला. पण, पाणी वितरण व्यवस्थेतील पाईप लाईनवरील ठिकठिकाणची मोठी गळती नगर परिषदेकडून वषार्नुवर्षे आजही दुर्लक्षित आहेत. त्यामुळे पाणीटंचाईला नगरपालिकाच कारणीभूत असल्याची ओरड आहे.

----------

उन्हाळ्यात घरोघरी निघाले कूलर

अमरावती : उन्हाळ्याच्या दिवसांत घरोघरी कूलर निघाले आहेत. त्याअनुषंगाने अपघात होऊ नयेत म्हणून महावितरणने कूलरचा वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले आहे. थ्री-पीन प्लगवरच वापर करावा. घरात अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर्स बसवून घ्यावेत. अर्थिंग योग्य असल्याची तपासणी सातत्याने करावी. कूलरमध्ये पाणी भरतेवेळी आधी वीज प्रवाह बंद करून प्लग काढावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--------------------------

तहसीलमधील पाणीटंचाईला जबाबदार कोण?

अमरावती : धारणी तालुक्यातील तब्बल १७० गावांतील शेकडो नागरिक दररोज येथील तहसील व पंचायत समिती कार्यालयात विविध कामांसाठी येतात. मात्र, या कार्यालयांमध्ये उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. या पाणीटंचाईला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

------------

खरीप हंगाम तोंडावर, नवी डीबी केव्हा?

अमरावती : शेतातील डीबीवरील उच्चदाबामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतातील ओलीत करणे कठीण होत आहे. त्यामुळे नवीन डीबी बसविण्याची मागणी पुसला येथील युवा मित्र मंडळ व शेतकऱ्यांनी महावितरणकडे केली आहे. त्यामुळे नवीन डीबी बसविण्याची मागणी सूरज धर्मे, संदीप बागडे, योगेश विंचूरकर यांनी केली आहे.

----------

धामोरी गावाला मिळाला बंपर निधी

अमरावती : आदर्श ग्राम धामोरी येथे पायाभूत सुविधांसह सौंदर्यीकरणाची अनेक कामे २ कोटी ५ लक्ष रुपये निधीतून केली जाणार आहेत. धामोरी येथे मुख्य रस्त्यापासून तलावापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण व पेव्हरची कामे करण्यासाठी ४३ लक्ष ३० हजार, स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी ११ लक्ष ७० हजार, तलाव सौंदर्यीकरणासाठी २५ लक्ष, तलावाच्या आऊटलेटवर लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी २२ लक्ष निधी मंजूर आहे.

-------

प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरण

अमरावती : जिल्ह्यात अधिकाधिक व्यक्तींचे लसीकरण होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांनंतर उपकेंद्रांवरही लसीकरणाची सुविधा देण्यात येत आहे. त्यानंतर गावोगावी शिबिरे घेण्याचेही नियोजन आहे. कोविडकाळात आरोग्य यंत्रणा जिवाची पर्वा न करता खंबीरपणे कार्यरत आहे. त्यामुळे यापुढेही अशाच खंबीरपणे लढण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

--------------

पैसा थेट ग्रामपंचायतीत, कामे शून्य

अमरावती : मेळघाटातील कुपोषण व बालमृत्यू कमी होत नसल्याचे लक्षात आल्यावर विकासाची कामे थेट ग्रामपंचायत स्तरावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. गावातील सरपंच आणि निवडून आलेले सदस्यांनी ग्रामस्तरावर असलेल्या समस्यांच्या निराकरणासाठी निधी खर्च करावा, असा त्यामागील उद्देश होता. मात्र, यातही राजकारण आले आणि राजकीय नेत्यांनी ग्रामपंचायतीला हाताशी धरून विकासनिधीचा पुरता चुराडा करून टाकला.

-------------

शहानूर रस्त्याचे बांधकाम केव्हा?

अमरावती : अचलपूर तालुक्यातील शहानूर रस्त्याच्या बांधकामाला ३५ वर्षे झाली. या कालावधीत रस्त्याची चाळण झाली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले. आजी-माजी आमदारांना निवेदनातून रस्त्याबाबत अवगत करून दिले. मात्र, रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.

------------

‘सिंचन प्रकल्प तात्काळ पूर्ण करा’

अमरावती : दर्यापूर तालुका हा खारपाणपट्ट्याचा भाग असल्याने येथील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीके घेता यावीत, त्यादृष्टीने तालुक्यातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश आमदार बळवंत वानखडे यांनी दिले. यावेळी त्यांच्यासमवेत पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

---------------

करजगाव परिसरात गुटखाविक्री जोरात

करजगाव : मोर्शी, रिद्धपूर, करजगावात १८ ऑक्टोबर २०२० रोजी केलेल्या तीन कारवायांमध्ये १८ लाख ६२ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. कारवाईला काही दिवस होत नाही तोच पुन्हा अवैध प्रतिबंधित गुटखाची विक्री राजरोसपणे होत आहे. अवैध धंद्यांवर अंकुश लागेल का, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.

-----------

फोटो पी ०४ कानतोडे

अर्जुन कानतोडे

अमरावती : योगाचार्य अर्जुन मारोतराव कानतोडे (७२, रा. हिवरखेड, ह.मु. राठीनगर, अमरावती) यांचे १ मे रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व बराच आप्तपरिवार आहे.

-------

फोटो पी ०४ मणकर्णा कडू

मणकर्णा कडू

पेठ मांगरुळी : येथील मनकर्णा कडू (९९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी व बराच आप्तपरिवार आहे. नागपूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

---------

मोर्शी येथे ऑनलाईन व्याख्यानमाला

मोर्शी : शेंदूरजना घाट येथील अतुल पडोळे व जरूड येथील सुषमा मानेकर या शिक्षकांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रम समितीद्वारे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेचे चौथे पुष्प विकास सलगर यांनी ‘शिक्षक : भूमिका व जबाबदारी’ या विषयावर गुंफले. अध्यक्षस्थानी कवी देविदास गुरव (सोलापूर) हे होते.

-----------

‘युवा वर्गाने कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी’

मोर्शी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, केंद्र शासनाने १ मेपासून १८ वर्षांवरील तरुणांसाठी कोरोना लसीकरण सुरू केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे कोणतेही दुष्परिणाम झालेले नाही, असेसुद्धा मत तज्ज्ञांनी मांडले आहे. सर्व तरुणांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लस टोचून घ्यावी, असे आवाहन आशिष टाकोडे यांनी केले आहे.

---------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.