राजस्थानातील कोटा येथे अडकलेले विद्यार्थी राज्यात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:00:14+5:30
आयआयटीसह मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी ते विद्यार्थी राजस्थानातील कोटा येथे गले होते. पण लॉकडाऊनमुळे ते तेथेच अडकून पडलेत. अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. त्यांना परत आणण्याची मागणी पालकांनी शासन - प्रशासनाकडे केली. यात पालकमंत्री ना. यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके यांच्यासह जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केले.

राजस्थानातील कोटा येथे अडकलेले विद्यार्थी राज्यात दाखल
अनिल कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : राजस्थान कोटा येथे अडकलेले ९५ विद्यार्थी १ मे रोजी महाराष्ट्रात दाखल झालेत. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवरील बहिरम चेक पोस्टवर एसडीओ संदीपकुमार अपार यांनी त्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
आयआयटीसह मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी ते विद्यार्थी राजस्थानातील कोटा येथे गले होते. पण लॉकडाऊनमुळे ते तेथेच अडकून पडलेत. अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. त्यांना परत आणण्याची मागणी पालकांनी शासन - प्रशासनाकडे केली. यात पालकमंत्री ना. यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके यांच्यासह जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केले. ३० एप्रिलला सायंकाळी ६ वाजता, राजस्थान कोटा येथून निघालेल्या सात एसटी बसेस बहिरम चेक पोष्टवर शुक्रवारी दाखल झाल्यात. तेथे एसडीओ संदीपकुमार अपार यांचेसह उपस्थित प्रशासकीय यंत्रणेने त्यांचे स्वागत केले. त्यांची पाणी व नास्त्याची व्यवस्था केली. शिरजगाव कसबा येथील वैद्यकीय पथकातील अपर्णा झोड, चित्रकार, आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी केली. यावेळी शिरजगावचे ठाणेदार गोपाल आध्यायसह पोलीस व राजस्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यांना १४ दिवसांकरिता संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.
राजस्थान कोटा येथे अडकलले विभागातील ९५ विद्यार्थ्यांचे बहिरम चेकपोष्टवर १ मे रोजी स्वागत केले. थर्मल स्कॅनिंगसह वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यातील हे विद्यार्थी आहेत.
- संदीपकुमार अपार
एसडीओ, अचलपूर