धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा कायम
By Admin | Updated: August 18, 2016 00:02 IST2016-08-18T00:02:41+5:302016-08-18T00:02:41+5:30
धनगर समाज हा रानावनात मेंढीपालन करुन उपजिवीका करणारा आहे. भटकी जमात अशी या समाजाची ओळख असून....

धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा कायम
गौरव सोहळा : पद्मश्री विकास महात्मे यांची रोखठोक भूमिका
अमरावती: धनगर समाज हा रानावनात मेंढीपालन करुन उपजिवीका करणारा आहे. भटकी जमात अशी या समाजाची ओळख असून त्याला ऐतिहासीक, सांस्कृतिक वारसा आहे. त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करुन आरक्षण मिळावे, हा लढा शेवटपर्यत कायम राहील, अशी भूमिका पद्मश्री खा. विकास महात्मे यांनी बुधवारी येथे मांडली.
येथील राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित गौरव सोहळा व सामाजिक चर्चासत्राप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, समाजसेवक रवींद्र कोल्हे, सुनीता महात्मे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खा. विकास महात्मे यांनी पद्मश्री ते खासदारकीचा प्रवास दिलखुलासपणे उलगडला. नेत्र शिबीरातून सामाजिक कार्याचा वसा मिळाल्याची बाब त्यांनी सांगितले.
आय बँक स्थापन केल्यामुळे गाव- खेड्यात रुग्णांची सेवा करता आली. नेत्र शिबीरातून एकाच वेळी हजारो रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याची संधी देखील मिळाली. संघर्षमय जीवनाचा उलगडा करताना त्यांनी पत्नी सुनीता महात्मे यांच्यासोबतच्या प्रेम वजा लग्नाच्या प्रसंगाने अनेकांना खिळवून ठेवले.
वैद्यकीय सेवेत असताना पद्मश्री पदवी मिळाली आता शासनाने खासदारकी बहाल करुन समाजाचे ऋण फेडण्याची संधी दिली आहे. मेंढपाळांना जंगलात चराईबंदी असल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे आता बंदिस्त मेंढीपालन हा पर्याय आणला आहे. या नव्या पर्यायाने भटकी जमात असलेल्या धनगरांच्या मुला, बाळांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटेल, असे तेम्हणाले.