कठोर कायदा, तरीही दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:19 IST2017-08-17T23:19:05+5:302017-08-17T23:19:30+5:30

स्थानिक श्री हव्याप्र मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांचे श्वानभक्षण प्रकरण ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे सर्वत्र गाजत आहे.

 Strict law, still neglected | कठोर कायदा, तरीही दुर्लक्ष

कठोर कायदा, तरीही दुर्लक्ष

ठळक मुद्दे जिल्हा प्रशासन उदासीन : ‘वसा’ संस्थेने घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक श्री हव्याप्र मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांचे श्वानभक्षण प्रकरण ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे सर्वत्र गाजत आहे. या पार्श्वभूमिवर पशू-पक्षी व पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत स्थानिक ‘वसा’ संस्थेनेदेखील पशू हत्येसंदर्भातील काही कायदेशीर बाबींना सामाजिक जबाबदारी म्हणून अधोरेखित केले आहे. मात्र, कायद्यात एवढ्या कठोर तरतुदी असूनही पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी मात्र, या प्रकरणाकडे गांभीर्याने बघायला तयार नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
‘वसा’ संस्थेचे सर्पमित्र रितेश हंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्या प्राण्यांवरील अन्याय रोखण्याकरिता तत्कालीन विधिमंडळाने ‘अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड आॅफ इंडिया’ची स्थापना केली. या आधारे ‘दि प्रिव्हेंशन आॅफ क्रुएल्टी आॅफ अ‍ॅनिमल्स अ‍ॅक्ट-१९६०’ची मांडणी करण्यात आली. या कायद्यांतर्गत सर्व प्रकारच्या जिवंत प्राण्यांना काडी-दगड किंवा तत्सम वस्तुने मारणे, लाथाडने, त्यांच्या अंगावरून वाहन नेणे, छळ करणे, जखमी करणे, हानीकारक औषधींचा प्रयोग करून मारणे, डांबून ठेवणे, त्रास होईल या पद्धतीने बांधून ठेवणे, गरजेप्रमाणे खाद्य, पाणी व निवारा न पुरविणे, जीवानिशी मारणे, क्रूर पद्धतीने ठार करणे याला दंडनीय अपराध मानले गेले आहे. ज्यामध्ये आर्थिक भुर्दंड व कारावास अशा दोन्ही तरतुदी आहेत. मात्र, कायदा एवढा कठोर असूनही अद्याप श्वानभक्षणप्रकरणी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वसतिगृहातील त्या परप्रांतीय विद्यार्थ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न पशूप्रेमींनी उपस्थित केला आहे. यावरून कुठेतरी माशी शिंकते आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे.

यापूर्वी झालेल्या कारवाया
सन २०१५ च्या मे महिन्यात मणिपूर येथील सुभाषनगर परिसरातील ३ युवकांना श्वानभक्षण प्रकरणी अटक करण्यात आली होेती. त्यांनी पाळीव श्वानाला ठार मारून शिजवून खाल्ले होते. पुराव्यानिशी त्यांना अटक झाली होती. त्यानंतर बंगळुरू येथील तीन विद्यार्थ्यांनी देखील पाळीव श्वानाला ठार करून मांसभक्षण केले होते. त्यांना रंगेहात अटक करण्यात आली होती. चेन्नई येथे ६ जुलै २०१६ रोजी मेडिकलच्या दोन विद्यार्थ्यांनी श्वानाला उंचावरून खाली फेकल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Web Title:  Strict law, still neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.