तरीही लहानेंना अभय का?
By Admin | Updated: December 30, 2014 23:24 IST2014-12-30T23:24:18+5:302014-12-30T23:24:18+5:30
तपोवनातील बालगृहात अनाथ, निराधार, निराश्रित मुली सुरक्षित नसल्याच्या मुद्यावर सर्वांचेच एकमत झाल्यानंतरच ११५ मुलींना इतरत्र हलविण्यात आले. अर्थात् तपोवनातील कारभारात अक्षम्य

तरीही लहानेंना अभय का?
हा तर दोषच ना ! : अंबापुरीच्या सन्मानावर घाला, नको कुणाचाही मुलाहिजा!
गणेश देशमुख - अमरावती
तपोवनातील बालगृहात अनाथ, निराधार, निराश्रित मुली सुरक्षित नसल्याच्या मुद्यावर सर्वांचेच एकमत झाल्यानंतरच ११५ मुलींना इतरत्र हलविण्यात आले. अर्थात् तपोवनातील कारभारात अक्षम्य सदोषता होती, हेच यायोगे सिद्ध झाले. असा सदोष कारभार सातत्याने हाकला जात असताना तपोवनात संचालकपदी कार्यरत असलेले प्रशासकीय अधिकारी अजय लहाने हे कोणते कर्तव्य पार पाडत होते, हा प्रश्न बोचणारा ठरतो.
अजय लहाने यांची सुमारे पाच वर्षांपासून विदर्भ महारोगी सेवा संस्थेच्या संचालकपदी नेमणूक आहे. त्या संस्थेतील कारभार निर्दोष, नियमसंगत आणि बालहक्क संरक्षणाच्या दृष्टीने चालावा यासाठी शासनाच्या या अधिकाऱ्याची नेमणूक आहे. विदर्भ महारोगी सेवा संस्थेत लहाने यांच्या रूपाने असलेला हा शासनाचा ‘तिसरा डोळा’ होता. या डोळ्याला ते सर्व दिसणे अपेक्षित होते, जे संस्थेतील नजरांना कदाचित दिसणार नाही, कधिकाळी दिसूनही ते बघणार नाहीत. सतर्कता, दूरदृष्टी, आकलन, अचूक निर्णयक्षमता आणि परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अंगी असावे, अशी शासनाची अपेक्षा आहे. म्हणून तपोवनाच्या संचालकपदी तशा दर्जाच्या अनुभवसंपन्न अधिकाऱ्याचीच नेमणूक करण्यात आली. शासनाचा वर्ग एकचा अधिकारी संस्थेच्या संचालकपदी असल्यामुळे शासन निर्धास्त होते. तपोवनातील कारभार पार पाडताना लहाने यांनी शासनाला अपेक्षित असलेली 'घारीची नजर' बाळगायलाच हवी होती. तो त्यांच्या कर्तव्याचाच भाग होता. ती नजर लहाने यांनी बाळगली असती तर ज्या मुलींची आयुष्ये उद्ध्वस्त झालीत, ती बचावलीही असती. समाजाचे म्हणा की त्या मुलींचे, हे दुर्दैवच की, असा अधिकारी तपोवनाच्या वाट्याला संचालक म्हणून लाभला की, पाणी डोक्यावरून वाहू लागल्यावरही तो सुस्तच होता. त्याची निद्रा त्यावेळी भंगली ज्यावेळी त्याला करण्यालायक काहीच बाकी उरले नव्हते.
संस्थेच्या घटनेत नमूद केल्याप्रमाणे, दैनंदिन कामकाजाची जबाबदारी संस्थेचे सचिव आणि संचालक यांच्या शिरावर आहे. अर्थात् सचिव आणि संचालक हे कमालीचे सतर्क असणे घटनेनुसार अपेक्षितही आहे नि बंधनकारकही! ज्यांच्या शिरावर जबाबदारी त्यांच्याच हाती अधिकारांचा राजदंडही असतो.