अवेळी पाणी; झोपेचे खोबरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 05:00 AM2022-05-14T05:00:00+5:302022-05-14T05:00:59+5:30

अमरावती शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळा असल्याने पाण्याची गरज जास्त भासत आहे. मात्र, त्यासाठी अनियमित वेळेचा बोजा सहन करायचा का, असा संतप्त सवाल नागरिकांचा आहे. रात्री १२ वाजता नळ सोडताना कुणाला गृहीत धरले जाते, हे अद्याप कोड्यात आहे. काही ठिकाणी दोन दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. तोही नियमित केला जात नसल्याने लोकांची प्रचंड नाराजी आहे.

Stagnant water; Sleeping coconuts! | अवेळी पाणी; झोपेचे खोबरे !

अवेळी पाणी; झोपेचे खोबरे !

Next

मनीष तसरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहराची तहान भागविणारा एकमेव तलाव म्हणजे माेर्शी येथील अप्पर वर्धा धरण होय. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने नलदमयंती तलाव हा शंभर टक्के पूर्ण भरला होता. सद्यस्थितीत धरणात पन्नास टक्के पाणी शिल्लक आहे. हे पाणी शहराची तहान भागविण्याकरिता पुरेसे असले तरी अपुरा पुरवठा, अनियोजित वेळी येणारे नळ यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा पुरता विचका झाल्याचा अनुभव अमरावतीकरांना येत आहे. 
अमरावती शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळा असल्याने पाण्याची गरज जास्त भासत आहे. मात्र, त्यासाठी अनियमित वेळेचा बोजा सहन करायचा का, असा संतप्त सवाल नागरिकांचा आहे. रात्री १२ वाजता नळ सोडताना कुणाला गृहीत धरले जाते, हे अद्याप कोड्यात आहे. काही ठिकाणी दोन दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. तोही नियमित केला जात नसल्याने लोकांची प्रचंड नाराजी आहे. पूर्ण एक तासही नळाला पाणी येत नसल्याची शहरातील महावीरनगर, नृसिंह कॉलनी, मच्छगंधा कॉलनी, सामरानगर येथे ओरड आहे. बडनेरा येथील आठवडी बाजार, अशोकनगर, राहुलनगर, नवी वस्ती बडनेरा या लोकवस्तीत पिण्याचे पाणी कमी दाबाने मिळते. 

२०३३ मधील नियोजन आताच
अमरावती ही ‘ड’ वर्ग महानगरपालिका असून, सध्याची लोकसंख्या ही जवळपास आठ लक्ष इतकी आहे. शहरापासून ५५ किलोमीटर लांब असलेल्या मोर्शी  येथील अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयातून पाणीपुरवठा करणारी योजना ही १९९४ मधील आहे. त्यानंतर २०१६-२०१७ मध्ये अमृत अभियान अमरावती शहराकरिता २०३३ ची लोकसंख्या ८,८३,९५४ इतकी गृहीत धरून प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, ती स्थिती आजच निर्माण झाली आहे.  

पुन्हा आंदोलन?
शिदोरी उशाशी अन् माणसे उपाशी अशी स्थिती अमरावतीकरांवर ओढवली आहे. अमरावती शहराची भरभराट होत आहे. टोलेजंग इमारती उभ्या होत आहेत. या शहरात वास्तव्यासाठी लोक उत्सुक आहेत. पाण्यासाठी मात्र आंदोलन करायचे का, हा प्रश्न आता उभा ठाकला आहे. 

आमच्याकडे नळाला पिण्याचे पाणी येण्याची वेळ निश्चित नाही. आले तरी पूर्ण पाणीसुद्धा भरून होत नाही तोच पाणी जाते. पाणी येईल म्हणून कोणाला तरी घरीच थांबावे लागते. 
- रेखा मानकर

नळाची वेळ निश्चित नाही. कधी रात्री ११, तर कधी १२ वाजता पाणी येते. कामावरून आल्यानंतर पाण्याची वाट पाहावी लागते. अनेकदा तक्रार केली आहे. 
- शिवांगी वेरूळकर 

उन्हाळा असल्याने पाण्याची वाढली मागणी 

शहरात पाणीपुरवठा करण्याकरिता अप्पर झोन व लोअर झोन अशी विभागणी केली आहे. प्रेशर काही ठिकाणी कमी आहे. मोर्शी येथील अप्पर धरणावर नियमित चार पंपाद्वारे पाणी घेतले जाते. मागणी वाढल्याने एक पंप पुढील आठवड्यात सुरू होईल. पाईपलाईन जुनी असल्याने त्यावर प्रेशर येऊ नये म्हणून काळजी घेत आहे.
- विवेक सोळंके, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

 

Web Title: Stagnant water; Sleeping coconuts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.