५ लाख एकरांतील सोयाबीन उद्ध्वस्त

By Admin | Updated: September 13, 2016 00:15 IST2016-09-13T00:15:03+5:302016-09-13T00:15:03+5:30

जिल्ह्यातील सव्वासात लाख एकरांतील सोयाबीनचे पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे.

Soybean destroyed 5 lakh acres | ५ लाख एकरांतील सोयाबीन उद्ध्वस्त

५ लाख एकरांतील सोयाबीन उद्ध्वस्त

सर्वेक्षण केव्हा ? : ३५ दिवसांपासून पावसात खंड; पीक विम्याचा लाभ मिळावा
गजानन मोहोड अमरावती
जिल्ह्यातील सव्वासात लाख एकरांतील सोयाबीनचे पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा स्थितीत सोयाबीन पावसाची नितांत गरज आहे. अन्यथा शेंगा पोचट राहून थेट उत्पादनावर परिणाम होतो. जिल्ह्यात मागील ३५ दिवसांपासून पावसाचा खंड आहे. पुढच्या तीन दिवसांत पाऊस न आल्यास संरक्षित सिंचनाची सोय असलेले क्षेत्र वगळता किमान ५ लाख एकरांतील सोयाबीन हातचे जाणार, अशी स्थिती उद्भवली आहे.
जिल्ह्यात १ जूनपासून अपेक्षित सरासरीच्या तुलनेत १११ टक्के पाऊस पडला. पेरणीपासून समाधानकारक व पोषक पाऊस असल्यामुळे सोयाबीनसह सर्वच पिके बहरात आली. सोयाबीन पीक सध्या शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे. पाऊस आल्यास शेंगांमधील दाणा भरला जातो. पाऊस नसल्यास दाणा बारीक राहतो व थेट उत्पादनावर परिणाम होतो. जिल्ह्यात मात्र ७ आॅगस्टपासून पावसात खंड पडला आहे. त्यामुळे हलक्या व माध्यम स्वरूपाच्या जमिनीतील सोयाबीन पिकांनी माना टाकल्या अहेत. काळ्या जमिनीत किमान आठवडा निघू शकतो. मात्र, इतर जमिनीतील किमान २ लाख हेक्टरमधील सोयाबिनचे पीक पावसाअभावी आताच उद्धवस्त झाले आहे. उर्वरित ३ लाख हेक्टरमधील सरासरी उत्पन्नात येत्या तीन दिवसांत पाऊस न आल्यास किमान ५० टक्क्यांची घट येणार आहे. जिल्ह्यात साधारणपणे २ लाख हेक्टरमध्ये संरक्षित सिंचनाची सुविधा आहे. केवळ याच शेतकऱ्यांना सोयाबीनचे उत्पन्न होऊ शकते. कपाशीची मुळे खोलवर जात असल्याने पिके काही काळ तग धरु शकतात. मात्र, पाऊस न आल्यास कपाशीची स्थिती देखील विदारक होऊ शकते. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी ३ लाख २३ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्र होते. या तुलनेत २ लाख ९१ हजार ३७ हेक्टर क्षेत्रात सोयाबिनची पेरणी झाली.

शासनाच्या अहवालाकडे लक्ष
अमरावती : अंजनगावात १५ हजार ४२० हेक्टर, जिल्ह्यात खरिपाच्या एकूण सरासरी क्षेत्राच्या किमान ४० टक्के क्षेत्रात सोयाबनचे पीक आहे. यंदा सुरूवातीच्या काळात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु ३५ दिवसांपासून पावसात खंड पडल्यामुळे ३ वर्षांनुसार यंदाही सोयाबीन पीक हातचे जाणार, अशी स्थिती आहे.
प्रतिकूल परिस्थितील घटकांमुळे पीकाचे नुकसान होत असल्यास हवामान घटकांचे आकडेवारीवरून प्राप्त होणाऱ्या छायाचित्रात अनुसरून राज्य शासनाकडील पीक बाधित क्षेत्राचा अवहाल, पर्जन्यमानाची व इतर कृषी हवामानविषयक आकडेवारी, प्रसारमाध्यमांचा अहवाल अशा प्रतिनिधीना निर्देशांकाच्या आधारे अपेक्षित नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के मर्यादेत नुकसान भरपाईची रक्कम आगाऊ देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेत हे निकष स्पष्ट केले असल्याने जिल्हा प्रशासनाचा वस्तुनिष्ट अहवाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

विमा योजनेच्या निकषात पावसात खंड घटक समाविष्ट
यंदाच्या खरीप हंगामापासून सुरु करण्यात अलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत म्हणजेच पूर, पावसातील खंड व दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्नामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यास अपेक्षित नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेत नुकसान भरपाईची रक्कम आगाऊ देणार व ही नुकसान भरपाई अंतिम नुकसान भरपाईतून समायोजित करण्यात येईल. याबाबत राज्य शासन व संबंधित विमा कंपनीमार्फत कारवाई करण्यात येईल, असे या योजनेच्या वैशिष्ठात स्पष्ट असल्याने कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला पाहिजे.

पीकाने ‘अन्टीथ्रेट’ अवस्था ओलांडली
सोयाबीन हे ८५ ते १०५ दिवसांच्या कालावधीत पीक आहे. जूनमध्ये पेरणी झालेले सोयाबीनची स्थिती बरी आहे. परंतु जुलै महिन्यातील सोयाबीनला पावसाची आवश्यकता आहे. पावसात खंड असल्याने अधिक बास्पीभवन होऊ नये म्हणून सोयाबीनचे पाने दिवसा मलून होऊन पाठमोरा भाग समोर येतो ही ‘अन्टीथ्रेट’ अवस्था पावसाचा ताण सहान करण्यासाठी सोयाबीन रोप स्वताला तयार करते, आता अवस्थादेखील पार पडली आहे. येत्या तीन दिवसांत पाऊस न आल्यास सोयाबीनच्या शेंगा पोचट राहून याचा थेट असर सरासरी उत्पन्नावर होणार असल्याची माहिती प्रादेशिक अनुसंधान केंद्राचे शास्त्रज्ञ योगेश इंगळे यांनी दिली.

अद्याप शेतकऱ्यांच्या तक्रारी नाहीत, याविषयी जिल्हा प्रशासनाला अहवाल मागवितो. शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे शासनाचे धोरण आहे.
- प्रवीण पोटे, पालकमंत्री.

Web Title: Soybean destroyed 5 lakh acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.