पेरणीपूर्वीच शेतकर्यांच्या ‘स्वप्नां’वर कुठाराघात!
By Admin | Updated: May 25, 2014 23:14 IST2014-05-25T23:14:25+5:302014-05-25T23:14:25+5:30
ग्रामीण भागातील शेतकर्याच्या संसारात असतेच काय? जीवन जगण्यापूरती आवश्यक भांडी, चार कपडे, नाही म्हणायला एखादे कपाट आणि त्यांची खरी संपत्ती म्हणजे शेतीसाठी लागणारी आवश्यक अवजारे,

पेरणीपूर्वीच शेतकर्यांच्या ‘स्वप्नां’वर कुठाराघात!
सुदेश मोरे -अंजनगाव सुर्जी ग्रामीण भागातील शेतकर्याच्या संसारात असतेच काय? जीवन जगण्यापूरती आवश्यक भांडी, चार कपडे, नाही म्हणायला एखादे कपाट आणि त्यांची खरी संपत्ती म्हणजे शेतीसाठी लागणारी आवश्यक अवजारे, काही बी-बियाणे. बैलगाडी, खते, कुटार आणि तुराटीचे भारे. असलेच तर एखादी गाय आणि वासरू. पण, नियतीचे मन पालटते आणि क्षणात सगळे होत्याचे नव्हते होऊन जाते. गावंडगावात शनिवारी मध्यरात्री घडलेल्या अग्नितांडवाला नियतीच्या क्रौर्याची परिसीमाच म्हणावी लागेल. पै-पै जोडून उभा केलेला संसार. राबराब राबल्यानंतर, रक्ताचे पाणी केल्यानंतर मिळालेल्या पैशांमधून जमवलेली एक-एक वस्तू म्हणजे त्यांचा जीव की प्राण. दिवसभर कष्ट करायचे आणि रात्री आपल्याशा घरट्यात निवांत पडायचे. कुडाच्या भिंती आणि तात्पुरते छप्पर असलेल्या या घरट्यातून पुन्हा दुसर्या दिवशीसाठीच्या श्रमाची ऊर्जा मिळवायची. पण, हा हक्काचा निवारा अन् काडी-काडी जोडून उभा केलेला संसार डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होताना बघून काय अवस्था झाली असेल त्यांची? गावंडगावातील ढोकणे व मारबते कुटुंब शनिवारच्या मध्यरात्री आपल्या चिलापिल्यांना कुशीत घेऊन नेहमीप्रमाणे निश्चिंतपणे आपापल्या घरात झोपी गेली. मध्यरात्री कधी तरी आग लागली आणि या कुटुंबांना आगीने घेरले. काही कळायच्या आतच घरासह साहित्याची राखरांगोळी झाली. ग्रामीण भागात पेरणीची लगबग सुरू झाली आहे. शेतात स्वप्ने पेरून ती उगवण्याची प्रतीक्षा ग्रामीण भागातील नागरिक डोळ्यांत प्राण आणून करीत असतात. परंतु पेरणीपूर्वीच ती स्वप्ने आगीने हिरावून घेतली. बी-बियाणे, मशागतीसाठी जमवून ठेवलेली रक्कम सगळे काही या आगीत स्वाहा झाले. डोळ्यांदेखत धडधडत जळणारा संसार बघण्याखेरीज बिचार्या ग्रामस्थांजवळ काहीही पर्याय नव्हता. महिलावर्गाचा आक्रोश तर पाहावला जात नव्हता. पुरूषांपेक्षा संसाराची ओढ महिलांना अधिक असते. त्यांचे सारे विश्वच त्यांच्या घराभोवती विखुरलेले असते. त्यामुळेच डोळ्यांसमोर होणारी घरकुलाची वाताहत त्यांना बघवत नव्हती. हाती लागेल तेवढे साहित्य वाचविण्याचा त्यांचा आटापिटा उपस्थिताना हेलावून सोडत होता.