राज्यात राेजगार हमी योजनेचे होणार सामाजिक अंकेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST2021-02-17T04:18:08+5:302021-02-17T04:18:08+5:30
गणेश वासनिक अमरावती: राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार आहे. त्याकरिता १५ फेब्रुवारी ...

राज्यात राेजगार हमी योजनेचे होणार सामाजिक अंकेक्षण
गणेश वासनिक
अमरावती: राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार आहे. त्याकरिता १५ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२१ हा कालावधी निश्चित करण्यात आला असून, साामाजिक अंकेक्षणासाठी ग्राम, समूह साधन व्यक्ती नियुक्त करण्यात आले आहेत. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर दक्षता बाळगून हे अंकेक्षण केले जाणार आहे.
सामाजिक अंकेक्षण सोसायटीचे कामकाज हे केंद्र सरकारच्या ग्राम विकास मंत्रालयातंर्ग़त चालते. केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाचे सहसचिव यांनी २९ मे २०२० रोजी राज्याच्या सामाजिक अंकेक्षण संचालकांच्या घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये मनरेगा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचे कार्योत्तर अंकेक्षण आणि समांतर सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने १५ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२१ या दरम्यान राज्यात १३ जिल्ह्यातील ३४ तालुक्यांमध्ये रोहयोचे सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हा साधन व्यक्तींने किमान ६० ग्राम पंचायतींच्या अंकेक्षणाचे टार्गेट सोपविण्यात आले आहे. या अंकेक्षण प्रक्रियेसाठी लागणारा खर्च तालुकानिहाय वितरित निधीतून करावा लागणार आहे. जिल्हा साधन व्यक्तींच्या नियंत्रणाखाली २० ग्राम साधन व्यक्ती व दोन समूह साधन व्यक्ती दैनंदिन मानधन तत्त्वावर नियुक्त करण्यात येणार आहेत. सन २०१९-२०२० या वर्षातील रोहयोच्या कामांचे सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार असल्याचे सामाजिक अंकेक्षण उपसंचालक आशिष लोपीस यांनी स्पष्ट केले आहे.
००००००००००००००००००
एका ग्रामपंचायतीसाठी चार दिवसांचा कालावधी
रोहयोचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी एका ग्रामपंचायतीकरिता चार दिवसांचा कालावधी लागेल. यात १०० टक्के जॉब कार्ड, पासबूक आणि १०० टक्के कामांच्या स्थळांची तपासणी, चार रजिस्टर, एमआयएसवरील माहितीची तुलनात्मक तपासणी करण्यात येईल. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा अहवाल ग्राम समिती अथवा सरपंच, ग्रामसेवक, दक्षता समितीपुढे कार्यवाहीसाठी सादर करावा लागणार आहे.
----------------------------
कामांचे छायाचित्र, वस्तुस्थिती असेल अहवालात
रोहयोचे सामाजिक अंकेक्षण करताना ज्या ठिकाणी कामे झाली असतील, त्या ठिकाणच्या कामांचे छायाचित्र, वस्तुस्थितीचा अहवाल जिल्हा साधन व्यक्तींना अहवालावातून नमूद करावा लागणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. रोहयोच्या कामांची वस्तुनिष्ठ माहिती द्यावी लागणार आहे.