अमरावतीला वीज वितरणात स्मार्ट सिटी करणार
By Admin | Updated: April 29, 2015 00:13 IST2015-04-29T00:13:19+5:302015-04-29T00:13:19+5:30
विजेबाबतीत अमरावती जिल्हा अद्यापही मागे आहे. मात्र ही परिस्थिती बदलविण्याची तयारी राज्याच्या ऊर्जा विभागाने केली आहे.

अमरावतीला वीज वितरणात स्मार्ट सिटी करणार
पत्रपरिषद : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
अमरावती : विजेबाबतीत अमरावती जिल्हा अद्यापही मागे आहे. मात्र ही परिस्थिती बदलविण्याची तयारी राज्याच्या ऊर्जा विभागाने केली आहे. वीज वितरण कंपनीमध्ये या जिल्हयात काही उणिवा आहेत. त्या दूर करून हा जिल्हा वीज वितरणाबाबतीत स्मार्ट सीटी म्हणून येत्या दोन वर्षात नावारूपास आणणार असल्याची माहिती राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत दिली.
अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात महावितरण कंपनीच्या आढावा बैठकीसाठी शहरात आले होते.
उर्जा विभागाने ग्राहक सेवा आणि उत्तम सुविधा देण्याकरिता प्रत्येक जिल्हयात तेथील वीज वितरण कंपनीच्या कामाचा आढावा घेवून त्यामधील उणिवा दूर करीत या परिस्थिमध्ये आमुलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार अमरावतीमधील नांदगावपेठ एमआयडीसी येथे ४०० के.व्हि चे नवीन सेंटर सुरू केले जाईल. शहरात इंफ्रा टू मधील कामे रखडून पडली होती. मागिल सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही; मात्र राज्याच्या नवीन भाजपा सरकारने यामध्ये लक्ष घालून अमरावती येथील दोनशे कोटींच्या या कामाला मंजुरी दिली. लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरूवातही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सातुर्णा येथे ३३ के.व्ही.चे केंद्र
वीज कंपनीने सातुर्णा येथे ३३ के.व्ही. वीज उपकेंद्र मंजूर केले आहे. मात्र जागा उपलब्ध होत नसल्याने हा प्रस्ताव पडून होता. अखेर मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत या केंद्रासाठी जिल्हाधिकारी यांनी जागा उपलब्ध करून देण्याची हमी घेतली. त्यामुळे लवकरच वीज उपकेंद्र कार्यान्वीत होईल, असे ना. बावनकुळे म्हणाले.
२४ तासांत
एलबीटी होणार रद्द
सध्या शहरात वीज कंपनीकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या वीज देयकावर एलबीटी आकारण्यात येते. मात्र ग्राहकांवरील हा आर्थिक भार कमी करण्यासाठी महानगरपालिकेने वीज कंपनीला एलबीटी हटविण्याबाबत एक लेखी पत्र द्यावे. सदर पत्र मिळताच २४ तासांत वीज देयकांवरील एलबीटी रद्द होईल, अशी घोषणा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.