व्यक्तिमत्त्वातील सहजता हीच यशाची परिभाषा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:35 IST2019-01-21T23:34:58+5:302019-01-21T23:35:14+5:30
गोड वाणी ओठांमधून प्रतिध्वनित होत असली तरी तिची निर्मिती आपुलकीच्या भावनेत होते. आपुलकीचा जन्म हा व्यक्तिमत्त्वातील सहजतेमुळे होतो, असे सूत्र सुनील झोंबाडे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले.

व्यक्तिमत्त्वातील सहजता हीच यशाची परिभाषा !
अमरावती : गोड वाणी ओठांमधून प्रतिध्वनित होत असली तरी तिची निर्मिती आपुलकीच्या भावनेत होते. आपुलकीचा जन्म हा व्यक्तिमत्त्वातील सहजतेमुळे होतो, असे सूत्र सुनील झोंबाडे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले.
विदर्भाला पोल्ट्री क्षेत्र अपरिचित असताना, पहिला पोल्ट्री ब्रिडिंग फार्म अमरावतीत सुरू करण्याचे धाडस करून ती संकल्पना विदर्भाच्या मातीत रुजविणारे, पशुखाद्यनिर्माते आणि पंचतारांकित नांदगावपेठ एमआडीसी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील झोंबाडे सांगतात, सत्ता; पैसा; ताकद यामुळे जे साध्य होऊ शकत नाही, ते केवळ आपुलकीने संवाद साधल्यामुळे साध्य होते. गोड बोलण्याचे दोन प्रकार असतात. केवळ औपचारीकता नि सभ्यता म्हणून गोड बोलणे आणि मनापासून संवाद साधणे. दोन्ही प्रकार लाभप्रदच. परंतु, मला आकर्षित करतो तो दुसरा प्रकार. यशासोबत सहजता जपण्याचे कायम भान ठेवले की, इतरांप्रति आपुलकी बाळगणे सहजसाध्य असल्याचे नोंदवून विठ्ठल वाघ यांच्या कवितेच्या ओळींची ते आठवण करून देतात, ''जरी आले चंद्र सूर्य हाती, माणसाने विसरू नये पायाखालची माती''
यशाच्या उत्तुंग शिखरावरही सहजतेने जगण्याचे अतुल्य उदाहरण सुनील झोंबाडे यांनी दिले. ते म्हणतात, मागच्या आठवड्यात मी दिल्ली विमानतळावर इकॉनॉमी श्रेणीच्या रांगेतील प्रक्रियेतून जात असताना बाजूच्या रांगेत चक्क रतन टाटा दिसले. विमान बाळगण्याच्या ऐपतीचा थोर उद्योजक इकॉनॉमी क्लासच्याच रांगेत उभा राहतो तीच सहजता, तेच यश...