शासकीय कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग
By Admin | Updated: September 23, 2016 00:12 IST2016-09-23T00:12:44+5:302016-09-23T00:12:44+5:30
नियोजनबद्धता, शिस्त आणि नियोजनाचा आदर्श घालून देणाऱ्या ‘सकल मराठा’ समाजाच्या गुरूवारी

शासकीय कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग
अनेकांच्या सुट्या : कार्यालयांत शुकशुकाट
अमरावती : नियोजनबद्धता, शिस्त आणि नियोजनाचा आदर्श घालून देणाऱ्या ‘सकल मराठा’ समाजाच्या गुरूवारी निघालेल्या मूकमोर्चात शासकीय कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. शेकडो कर्मचारी कामाच्या ठिकाणी सुट्या टाकून मोर्चात सहभागी झाले होते.
विविध शासकीय कार्यालयांत कार्यरत बहुतांश मराठा कर्मचाऱ्यांनी रीतसर सुटी घेतली होती. यामुळे शहरातील विविध शासकीय कार्यालयांत शुकशुकाट दिसून आला. जिल्हा परिषद, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण, विभाग व अन्य विभागातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारीच मोर्चात सहभागी होण्यासाठी आपापल्या विभागप्रमुखांकडे सुटीचे अर्ज केले होते. महिला कर्मचारीदेखील मोर्चात सहभागी झाल्या होत्या, हे विशेष. या मूकमोर्चात अनेक शिक्षक, प्राध्यापकांचा लक्षणीय सहभाग होता. अनेक शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्जित रजा, किरकोळ रजा आणि अर्ध्या दिवसाची रजा घेतली होती. बोटावर मोजण्याइतपत अधिकारी व कर्मचारी कार्यालयांत दिसून आले. शासकीय कार्यालयांत फेरफटका मारला असता सुटीच असल्याचा भास होत होता. (प्रतिनिधी)
१५ चिमुकल्यांची पालकांपासून काहीवेळ ताटातूट, सुखरुप परत
मराठी अस्मितेसाठी असलेल्या या मोर्चात लाखो मराठा बांधव सहकुटूंब सहभागी झाले होते. नेहरु मैदान परिसरातून रिदम रोशन साहू नामक चिमुकल्याची आई-वडिलांपासून ताटातूट झाली होती. रिदमला पोलिसांनी शहर कोतवाली ठाण्यात नेले. त्यानंतर तब्बल तासभराने त्याचे पालक रिदमला घेण्यास आले. त्याचप्रमाणे मोर्चादरम्यान इतर १५ चिमुकले पालकांपासून विलग झाले होते. या मुलांच्या नावाची गर्ल्स हायस्कूल चौकातील मंचावरून घोषणा करण्यात आली. त्यामुळे यासर्व मुलांना काही वेळातच पुन्हा आई-वडिलांचे सानिध्य मिळाले.
गालबोट नाही, पोलिसांच्या कसोटीवर उतरले ‘सकल मराठा’!
लाखो मराठे रस्त्यावर उतरले होते. मात्र, मराठ्यांचा हा मूकमोर्चा विधातक नाही, असा ठाम विश्वास पोलिसांना होता आणि त्या विश्वासावर मराठे खरे उतरले आहे. मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीचा असल्यामुळे लाखो मराठ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ दीड हजार पोलिसांनी सांभाळली. मराठ्याचा मूकमोर्चा अभूतपूर्व होण्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी परसली होती. त्यादृष्टीने पोलीस विभागाने नियोजनसुद्धा केले. मराठ्यांनी अन्य शहरात काढलेल्या मोर्चाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागले नाही, ही बाब अमरावती पोलिसांनाही माहिती होती. मराठ्यांच्या मोर्चात लाखो मराठे सहभागी होणार असल्याचे आधीच पोलीस विभागाला कळले होते. त्या अनुषंगाने पोलीस विभागाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व ठाण्याचे कर्मचारी व ग्रामीण भागातील प्रत्येक ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी, असा केवळ दीड हजार पोलीस बंदोबस्ताकरिता सज्ज केला. मराठ्यांचा मोर्चा हा शांततेत पार पडणार असल्याचा विश्वास पोलिासांना होता. पोलिसांच्या या विश्वासावर मराठे खरे उतरला असून या मूकमोर्चात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडली नाही.
पीडीएमसीने पुरविली वैद्यकीय सेवा
मराठा क्रांती मूकमोर्चाची व्याप्ती लक्षात घेता यात आबालवृद्ध सहभागी होणार, हे निश्चित असल्याने एखादवेळी आपत्कालीन स्थिती उदभवल्यास मोर्चेकऱ्यांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमुने शहरात पाच ठिकाणी प्रथमोपचार केंद्र उघडले होते. राजकमल चौक, इर्विन चौक, जयस्तंभ चौक व गर्ल्स हायस्कूल चौक व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाजवळ नागरिकांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. यात बडनेरा येथील डॉ.अमोल वसू व पीडीएमसीच्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता.