ब्रिटिशकालीन बैलबाजाराला घाणीचा वेढा

By Admin | Updated: June 23, 2015 00:52 IST2015-06-23T00:52:15+5:302015-06-23T00:52:15+5:30

येथील ब्रिटिशकालीन बैलबाजार, आठवडी बाजार, कोंडवाडा आदी परिसराला घाणीचा वेढा पडला असून...

The siege of the British bullock market | ब्रिटिशकालीन बैलबाजाराला घाणीचा वेढा

ब्रिटिशकालीन बैलबाजाराला घाणीचा वेढा

कारवाई शून्य : प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त
सतीश बहुरुपी राजुराबाजार
येथील ब्रिटिशकालीन बैलबाजार, आठवडी बाजार, कोंडवाडा आदी परिसराला घाणीचा वेढा पडला असून ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. साचलेल्या डबक्यांमध्ये निर्माण होणाऱ्या जंतुंमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
सन २०१० मध्ये तापाच्या उदे्रकाने वरूड तालुका ढवळून निघाला होता़ सन २०११-१२ मध्येसुध्दा देऊतवाडा, राजुराबाजार, वाडेगाव, जरुड परिसरात विषाणूजन्य तापामुळे अनेकांचा मृत्यू झाला. दरवर्षी आरोग्य विभागासह महसूल आणि पंचायत प्रशासनाकडून अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या बैैठका घेऊन ग्रामीण व शहरी भागातील शेणाचे उकिरडे, पिण्याच्या पाण्याचे शुध्दीकरण करणे, तसेच साचलेले डबके, धूर फवारणी, घाणीचे साम्राज्य होऊ न देण्याच्या सूचना देण्यात येतात. परंतु दिलेल्या निर्देशाचे तालुक्यात कुठेही पालन होताना दिसत नाही. ग्रामीण भागात आजही उकिरडे जैसे थे पडून आहेत. घाणीचे साम्राज्य आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन आजही याबाबत अनभिज्ञच आहे.
गत चार वर्षांपासून तालुक्यावर साथीच्या आजाराचे थैैमान असल्याने अनेकांना विषाणूजन्य, जलजन्य, कीटकजन्य आजाराने ग्रासले होते. सोबतच डायरिया, हिवताप, मलेरिया, टाईफाईड, डेंग्यू आदी आजार तोंड वर काढत असल्याचे सांगण्यात येते. परंतु यावर कायमस्वरुपी उपायोजना अद्यापही करण्यात आलेले नाही. दोन वर्षांपूर्वी राजुराबाजार परिसरात स्वाईनफ्ल्यू, डेंग्यूने काही लोकांचा मृत्यू झाला. पावसाळा सुरु झाल्याने कॉलरा, अतिसार, कावीळ, विषमज्वर, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनीया, चंडीपुरा, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्लू या आजारावर नियंत्रण कसे आणता येईल याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत मार्गदर्शन करण्यात येते. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीचा अभाव असल्याने केवळ कागदी घोडे नाचविण्यात प्रशासकीय यंत्रणा गुंतलेली असते. प्रत्यक्षात कामगिरी बजावली जात नसल्याने निष्पाप लोकांना बळी पडावे लागते. आरोग्य विभाग दक्ष असला तरी स्थानिक प्रशासन मात्र दखल घेत नाही ही शोकांतिका आहे. ग्रामीण भागात ठिकठिकाणी असलेले शेणखताचे ढिगारे उचलणे, डबके वाहते करणे, पाण्याचे नमुने तपासून घेणे, ब्लिचिंग पावडर टाकून पाणी स्वच्छ करणे, कोरडा दिवस पाळणे यासह आदी सूचनांचे पालन झाले तरच साथीच्या आजारावर प्रतिबंध घालता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. कोंडवाडा, पोलीस चौकी परिसरासह आदी वस्त्यांमध्ये घाणीचे साम्राज्य आहे. आठवडी बाजार, ब्रिटिशकालीन बैैल बाजारात तसेच मडघ्या शेजारी घाण पसरल्याने वराहांची वसाहतच निर्माण झाली आहे. मोठमोठी डबके साचली असल्याने डासांच्या उत्पत्तीचे ठिकाण बनले आहे. बाहेरगावाहून येणारे शेतकरी, पशुधन खरेदी करणाऱ्या नागरिकांच्यासुध्दा आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परंतु याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे.

-तर त्वरित वैद्यकीय उपचार घ्या
तापाची साथ, डायरियाची साथ येऊ नये म्हणून सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. याकरिता साफसफाई, घाणीचे साम्राज्य, डबक्यातील पाणी वाहते करणे, उकिरडे उचलून गावाबहोर नेणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, पाणी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. आरोग्य विभाग रुग्णांना सेवा देण्याकरिता सज्ज असून साथीचे आजार उद्भवल्यास किंवा तशी लक्षणे दिसून आल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्कसाधावा, असे आवाहन राजुराबाजार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संजय टाकरखेडे यांनी सांगितले.
पाणी उकळून पिणे गरजेचे
तापाच्या साथीने कहर केला असून बालकांमध्ये अधिक प्रमाण आहे. याकरिता पाणी उकळून प्यावे, साफसफाई, घाणीचे साम्राज्य नष्ट करणे, ताप आल्यास वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. सर्दी, ताप, खोकल्यासह डायरियाच्या रुग्णांची संख्या अधिक असून बालरुग्णालयात गर्दी वाढल्याचे बाल रोगतज्ज्ञ प्रवीण चौधरी यांनी सांगितले. यामुळे साथरोगाचा उद्रेक होण्यापूर्वीच नगरपरिषद, ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवावून प्रतिबधांत्मक उपायोजना करणे गरजेचे आहे.

Web Title: The siege of the British bullock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.