दुचाकींवरील ‘साईड ग्लास’ बेपत्ता
By Admin | Updated: August 24, 2014 23:13 IST2014-08-24T23:13:24+5:302014-08-24T23:13:24+5:30
वाहनधारकाला वाहन चालविताना मागून येणाऱ्या वाहनांची स्थिती आणि अंदाज कळावा, याकरिता दुचाकी, चारचाकी व इतर मोठ्या वाहनांनादेखील साईड ग्लास बसविलेले असतात.

दुचाकींवरील ‘साईड ग्लास’ बेपत्ता
अमरावती : वाहनधारकाला वाहन चालविताना मागून येणाऱ्या वाहनांची स्थिती आणि अंदाज कळावा, याकरिता दुचाकी, चारचाकी व इतर मोठ्या वाहनांनादेखील साईड ग्लास बसविलेले असतात. मात्र, आपल्या वाहनाची शोभा जाईल म्हणून आणि फॅशन म्हणून अनेक वाहनचालक आपल्या वाहनांना साईड ग्लास लावत नसल्याची बाब 'लोकमत'ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या कुठल्याही दुचाकी अथवा चारचाकी वाहनांच्या दोन्ही बाजूला, चालकाला मागून येणारे वाहन दिसेल, अशा ठिकाणी साईड (मिरर) लावणे अनिवार्य आहे. मात्र फॅशन करण्याच्या नादात तरूण-तरूणीच नव्हे तर ज्येष्ठांकडूनदेखील या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. यामध्ये सर्वाधिक उल्लंघन करणारे मात्र महाविद्यालयीन युवक,युवतींचाच समावेश आहे. केवळ आवडत नाही म्हणून अनेकांकरवी साईड ग्लास काढून ठेवले जातात.
एखादी दुर्घटना घडल्यास त्यांचे गंभीर परिणाम रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनादेखील भोगावे लागतात. त्यामुळे वैयक्तिक निर्णय घेताना त्याचे परिणाम सार्वजनिक तर उरणार नाही ना याची जाणीव प्रत्येकाला असणे गरजेचे आहे.
अलीकडच्या काळात शहरातील रस्त्यांवर घडणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण लक्षात घेऊन 'लोकमत'ने शहरातील अनेक दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना याबाबत काही प्रश्न विचारलेत. नागरिकांच्या आणि वाहतूक पोलिसांच्या नजरेतून अंत्यत क्षुल्लक असलेल्या या बाबींचा उहापोह केल्यानंतर काही निष्कर्ष समोर आले आहेत. अनेक दुचाकी व चारचाकी वाहनधारक फॅशन म्हणून वाहनांना साईड मिरर लावण्याचे टाळतात. तर काही जण याबाबत कारवाई होऊ शकते. मात्र वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा प्रकार शहरात सर्रास चालत असल्याचे आढळून आले. तसेच काही बहाद्दर वाहनधारकांनी तर साईड मिररची आवश्यकताच काय, असा प्रतिप्रश्न केला. काहींनी मात्र साईड ग्लास अंत्यत आवश्यक असल्याचे प्रामाणिकपणे सांगितले.
अनेकदा लहान सहान अपघातांमुळे तुटफूट झाल्याने साईड मिरर तुटल्यास परवडणारे नसल्याने परत लावणे टाळले जाते. एका बाजूचे साईड मिरर तुटल्यास दुसऱ्या बाजूचा देखील काढणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकदा गर्दीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांचे साईड मिरर चोरीला जातात, असेही प्रकार शहरात वाढले आहेत. अनेक तरूण-तरूणींकडून केवळ चेहरा न्याहाळण्यासाठीच साईड मिररचा वापर केला जातो.
नियमांच्या विरोधात जाणाऱ्या या सर्व बाबींकडे वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष केले जाते. यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची तर वाहतूक पोलीस वाट पाहत नाही ना!, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.