पुत्रप्राप्तीसाठीही सिद्धी !

By Admin | Updated: September 9, 2016 00:29 IST2016-09-09T00:29:37+5:302016-09-09T00:29:37+5:30

शंकर महाराज यांनी लिहिलेल्या 'अनुभव ब्रह्म' या पुस्तकात पुत्र-धन प्राप्तीची सिद्धी सांगण्यात आली आहे.

Siddhi for son! | पुत्रप्राप्तीसाठीही सिद्धी !

पुत्रप्राप्तीसाठीही सिद्धी !

अनुभव ब्रह्म : स्त्रीकर्तृत्व पूजणाऱ्या जिल्ह्यात ही चर्चा कशासाठी ?
अमरावती : शंकर महाराज यांनी लिहिलेल्या 'अनुभव ब्रह्म' या पुस्तकात पुत्र-धन प्राप्तीची सिद्धी सांगण्यात आली आहे. शासन आणि समाजहीत जपणारी देशभरातील तमाम मंडळी स्त्रीजन्मचा गौरव करण्यात मग्न असताना, पुत्राला धनाच्या रूपाने सादर करून त्याच्या प्राप्तीसाठीची सिद्धी सांगण्याचे प्रयोजन काय, हा प्रश्न उपस्थित होतो.
स्त्रीशक्तीची उपासना करणारा हा अमरावती जिल्हा. आई अंबा आणि माता एकवीरा हे या जिल्ह्याचे आराध्य दैवत. महाभारत काळापासून या जिल्ह्याला स्त्रीमहिमेचा गौरवशाली इतिहास लाभला आहे. आजही आई अंबेच्या नावावरून अमरावतीला अंबानगरी, असे संबोधले जाते.
अगस्ती ऋषींची पत्नी लोपामुद्रा, प्रभू रामचंद्रांची आजी अजपत्नी इंदुमती, राजा भगिरथांची माता सुकेशनी, नल राजाची पत्नी दमयंती आणि भगवान श्रीकृष्णाची पत्नी विदर्भकन्या देवी रुक्मिणी या सर्वच स्त्रीशक्तींचे माहेर अमरावती जिल्हाच. स्त्रीकतृत्त्वाला पूजण्याची, सन्मानित करण्याची संस्कृती जोपासणारा हा जिल्हा म्हणूनच देशाला पहिली महिला राष्ट्रपती देऊ शकला. स्त्रीकर्तृत्त्व भूषविण्याची ही परंपरा अखंडपणे कायम आहे. विदर्भातून निवडून आलेल्या एकमेव महिला आमदार तिवस्यातील अर्थात्च अमरावती जिल्ह्यातील आहेत.
देशभरात स्त्रीजन्माविषयी प्रयत्नपूर्वक जागृती निर्माण करण्याची गरज भासत असताना अमरावती जिल्ह्यात स्त्रीजन्मासंबंधी, स्त्रीकर्तृत्त्वासंबंधी अनुकूल वातावरण आहे. अमरावती जिल्ह्यातील संत परंपरेनेही या वातावरणाला बळकटीच दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असो वा वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा असोत, सर्व संतांनी स्त्रीजन्माला दुय्यम स्थान मिळेल अशा पद्धतीने पुत्रजन्माला बळ दिले नाही. उलटपक्षी स्त्री-पुरुष समानता त्यांनी समाजाला शिकविली.
शंकर महाराज यांनी स्वानुभूतीतून लिहिलेल्या ‘अनुभव ब्रह्म’ या ग्रंथात ज्या अष्टसिद्धी सांगितल्या आहेत, त्यात पुत्रप्राप्तीसाठीही सिद्धी सांगण्यात आली आहे. आताही विक्रीला उपलब्ध असलेल्या या ग्रंथात पुत्राला त्यांनी धन असे संबोधले आहे. पुत्र हे धन आणि पुत्री ही अडचण, अशी मानसिकता बाळगणाऱ्या मंडळींना हे लिखाण अर्थात्च आकृष्ट करणारे आहे. ज्यांना मुलगी नको, मुलगाच हवा, अशांनाही पुुत्रप्राप्तीसाठीची सिद्धी आकर्षित करण्याची शक्यता आहे. पुत्र किंवा पुत्री होणे हे गुणसूत्रांच्या गणितांवर अवलंबून असल्याचे विज्ञानाने सिद्ध केले आहे. मुलगा किंवा मुलगी दोन्ही जन्मांचे स्वागत करणे केवळ नैतिकच नव्हे, तर आम्हा सर्वांची कायदेशीर जबाबदारीही आहे. स्त्रीजन्मदर वाढविण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासकट अवघी यंत्रणा तळमळीचे प्रयत्न करीत असताना शंकर महाराज यांनी लिहिलेली पुत्र-धनप्राप्तीसाठीची चर्चा उपयोगी कशी? हा ग्रंथ सामाजिक समतोल साधण्यासाठी नेमकी कशी भूमिका बजावणार, असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
उपस्थित होणाऱ्या अशा नाना प्रश्नांची उत्तरे 'लोकमत'ला आणि सामान्यजनांना शोधवृत्तमालिकेच्या अगदी सुरुवातीपासूनच हवी आहेत. संवादातून आश्रमाची भूमिकाही कदाचित स्पष्ट होऊ शकेल; तथापि प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आश्रमाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. आश्रमाने ना प्रवक्ता नेमला, ना शंकर महाराजांशी चर्चा घडवून आणली. केवळ प्रश्न विचारण्यासाठीच जेथे निमंत्रित केले जाते; त्या पत्रपरिषदेतदेखील आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी 'लोकमत'च्या प्रश्नांची उत्तरे देणार नसल्याचे सांगून टाकले. लोकभावनांशी निगडित अनेक प्रश्न त्यामुळे अनुत्तरित आहेत.

Web Title: Siddhi for son!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.