‘श्रावण’धाराही कोरड्याच
By Admin | Updated: August 19, 2014 23:24 IST2014-08-19T23:24:42+5:302014-08-19T23:24:42+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही सरासरीपर्यंत पाऊस पडला असला तरी जिल्ह्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट निर्माण होऊ लागले आहे. उशिरा का होईना पाऊस पडेल,

‘श्रावण’धाराही कोरड्याच
आपत्ती : यंदाही पाऊस नसल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट
जितेंद्र दखने - अमरावती
अमरावती : मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही सरासरीपर्यंत पाऊस पडला असला तरी जिल्ह्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट निर्माण होऊ लागले आहे. उशिरा का होईना पाऊस पडेल, अशी आशा असताना श्रावणधारा बरसल्या नाहीत. अप्पर वर्धा, शहानूर, चारगढ, विश्रोळी धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने धरणसाठे वाढल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
पावसाचे अडीच महिने कोरडे गेल्यानंतर श्रावण महिन्यात श्रावणधारा कोसळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. श्रावण महिन्यातील तीन आठवड्यानंतरही जिल्ह्यातील १४ तालुके पूर्ण कोरडे गेले आहे. जिल्ह्यातील विविध धरण क्षेत्रातच पाऊस चांगला बरसला. धरणे निम्याहून अधिक भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाल्याचा दिलासा मिळाला. मात्र शेती पिकाला आवश्यकतेनुसार पावसाचे पाणी मिळाले नाही. यंदा जिल्ह्यात पावसाची सरासरी ४५३.७ मिलीमिटर एवढी आहे.
मागील वर्षी आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात सरासरी ७४१.७३ मिलीमीटर म्हणजेच १३३.१२ टक्के पावसाची नोंद झाली होती. यावर्षी सरासरी ४५३.७ मिलीमिटर म्हणजे केवळ ८०.४ टक्केच पाऊस बरसला.
यंदा चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक सरासरी ७८.३ टक्के पाऊस झाला. आता या तालुक्यातही पाऊस ओसरला आहे. इतर तालुक्यामध्ये मात्र पावसाची सरासरी केवळ ७०.८ टक्क्यांच्या आसपास आहे. श्रावण महिन्यात चांगला पाऊस होईल या अपेक्षेने सुमारे साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाअभावी पिके कोमेजू लागली आहेत.