शिरीष चौधरींना पोलिसांचे अभय का ?
By Admin | Updated: September 13, 2016 00:13 IST2016-09-13T00:13:28+5:302016-09-13T00:13:28+5:30
नरबळीच्या जीवघेण्या हल्ल्यातून प्रथमेश वाचला खरा; परंतु आता आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी...

शिरीष चौधरींना पोलिसांचे अभय का ?
नातेवाईक अस्वस्थ : प्रथमेशचे बरेवाईट झाले तर पोलीस ठरतील दोषी!
अमरावती : नरबळीच्या जीवघेण्या हल्ल्यातून प्रथमेश वाचला खरा; परंतु आता आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी आणि त्यांच्या सोबतीला असलेले काही ट्रस्टी प्रथमेशच्या जगण्या-मरण्यासंबंधीचे प्रश्न निर्माण व्हावेत, अशा पद्धतीने त्याच्या मागावर असल्याचे वारंवार समोर येत आहे. तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे आरोप असलेल्यांना अभय का देतात, असा सवाल प्रथमेशच्या हितचिंतकांना अस्वस्थ करू लागला आहे.
प्रथमेश प्रकरणाचा तपास असमाधानकारकरित्या सुरू असल्याची भावना प्रथमेशच्या नातेवाईकांची आणि त्याच्या न्यायासाठी संघर्ष करणाऱ्यांची आहे. संबंधित प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा सीबीआयकडे सोपविण्याची जोरदार मागणी आतापर्यंत विविध माध्यमांतून करण्यात आली.
प्रथमेश प्रकरण अत्यंत संवेदनशील झालेले असतानाही, पोलीस जो तपास करीत आहेत त्यासंबंधी योग्य ती माहिती तपास अधिकाऱ्याकडून दिली जात नाही. कुणीही काहीही विचारले तर केवळ 'तपास सुरू आहे' इतकेच उत्तर श्रीनिवास घाडगे देतात. जिल्हा पोलीस अधीक्षकांशी कुणी संपर्क साधला तर तपास अधिकारी घाडगे यांच्याशी संपर्क साधा, असे त्यांचे ठरलेले उत्तर असते. पोलिसांच्या या कार्यपद्धतीमुळे तपासात काही गुढ तर लपलेले नाही ना, अशी शंका प्रथमेशप्रेमींना निर्माण झाली आहे.
आता प्रथमेशचा इलाज सुरू असताना आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी हे इस्पितळात येऊन धमकावतात. बेकायदा, आक्षेपार्ह आणि संशयास्पद पद्धतीने वागतात. ओळख लवपून तिऱ्हाईत लोकांना आणतात. विरोध केल्यास अंगावर धावून येतात, अशा तक्रारी आप्तेष्टांच्या आहेत. तक्रारीत गांभीर्य आहे. एकदा प्रथमेश गमावला होता. प्रथमेशच्याच केवळ जिद्दीने त्याला संजीवनी मिळाली. आता तो स्थिरावतो आहे. प्रथमेश जगावा. उदंड जगावा, ही त्याच्या आई-वडिलांची आणि रक्ताच्या नात्यातील सर्वांचीच अहोरात्र प्रार्थना आहे. परंतु इस्पितळात प्रथमेशची काळजी वाहणाऱ्या प्रत्येकच हृदयात क्षणाक्षणाला धस्स होत असते. प्रथमेशला पुन्हा ठार मारण्याचा डाव आखला जात आहे, ही त्यांच्या काळजात रूतून बसलेली भिती त्या सर्वांची धडधड वाढवून जाते. कुठल्याही स्थितीत त्यांना आता प्रथमेश गमवायचा नाही. त्याचमुळे तर प्रथमेशच्या नातेवाईकांनी काही दिवसांपूर्वी अमरावतीत येऊन जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांचे कार्यालय गाठले. सायंकाळी एसपी नसल्याने सर्व नातेवाईक उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर कदम यांना भेटले. इतक्या गंभीर मुद्यासंबंधीची तक्रार वाचून चर्चा करण्याऐवजी त्यांच्या दालनात बसलेले पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनीच उपअधीक्षकांसमोर चढ्या आवाजात आलेल्यांचे म्हणणे उडवून लावले. समाधान न झालेल्या नातेवाईकांनी एसपींच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जाऊ नये यासाठीही नातेवाईकांवर पोलिसांकडून दबाव आणण्यात आला. दबाव झुगारून नातेवार्इंकांनी एसपींचे घर गाठलेच. तेथे पूर्वीपासूनच कदम यांच्यासकट पोलीस ताफा सज्ज होता. साहेब भेटणार नाहीत. परत जाऊन अतिरिक्त एसपींशी भेटा, असा हुकूम त्यांनी सोडला. मुद्दा थेट प्रथमेशच्या जगण्या-मरण्याशी संबंधित असताना पोलिसांचा हा बोथटपणा बघून नातेवार्इंक संतापले. प्रतिमा राऊत यांनी रणरागिणीचे रूप धारण केले. तेव्हा कुठे एसपींना भेटू दिले गेले, तेही दोघांनाच. सारीच हकीकत एसपींना कथन केली गेली. परंतु या गंभीर मुद्याची दखल घेतल्याचे परिणाम नातेवाईकांना जाणवत नाहीत. नातेवाईक इतक्या तळमळीने तक्रार करतात तरीही त्या तक्रारीची दखल घेऊन शिरीष चौधरी यांची चौकशी का करण्यात आली नाही ? चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हे का दाखल करण्यात आले नाहीत, असा सवाल प्रथमेशच्या नातेवाईकांना अस्वस्थ करीत आहे.