संततधार पाऊस, अन्नाविना अनोळखी इसमाचा मृत्यू
By Admin | Updated: August 9, 2015 00:24 IST2015-08-09T00:24:02+5:302015-08-09T00:24:02+5:30
राहायला घर नाही, खायला अन्न नाही. त्यात संततधार पाऊस आणि वातावरणात गारवा, अशा स्थितीत परिस्थितीने आधीच जीर्ण झालेल्या ...

संततधार पाऊस, अन्नाविना अनोळखी इसमाचा मृत्यू
परिचारिका वसतिगृहासमोरील घटना : निराधार, बेघर नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमच
वैभव बाबरेकर अमरावती
राहायला घर नाही, खायला अन्न नाही. त्यात संततधार पाऊस आणि वातावरणात गारवा, अशा स्थितीत परिस्थितीने आधीच जीर्ण झालेल्या आणि दररोज फुटपाथवर झोपणाऱ्या त्या अनोळखी इसमाला तग धरता आला नाही. थंडी व अन्नाविना तडफडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी इर्विन चौकातील परिचारिका वसतिगृहासमोर घडली. अद्याप ‘त्या’ अनोळखी इसमाची ओळख पटली नसून शहर कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
४८ तास संततधार पाऊस बरसला. या तीन दिवसांत शेकडो निराधार व बेघर नागरिकांचे अक्षरश: हालहाल झाले. पाऊस नसताना निदान उघड्यावर जीवन कंठणाऱ्या लोकांना एखाद्या सहृदयाकडून खायला तरी मिळते. पण, पावसात ती देखील सोय होत नाही. त्यात पावसामुळे वातावरण गारठलेले. अंगावर पुरते कपडे नाहीत. त्यामुळे हा गारठा आणि पोटात उठलेल्या भुकेच्या आगडोंबामुळेच ‘त्या’ निराधाराचा मृत्यू झाला. परिचारिका वसतिगृहासमोरील फुटपाथ भिकाऱ्यांचे आश्रयस्थान बनले आहे. येथे अनेक दिवसांपासून चार भिकारी तळ ठोकून आहेत. यातील एकाची अवस्था काही दिवसांपासून अन्नावाचून अत्यंत वाईट झाली होती. त्यातच त्याच्या पायाला दुखापत झाल्याने तो चालू शकत नव्हता. पावसामुळे त्याला मदतही मिळाली नाही. शेवटी शनिवारी सकाळी भुकेने तडफडून त्याचा मृत्यू झाला.
महापालिकेचे आश्रयस्थान कुचकामी
निराधारांसाठी महानगरपालिकेने आश्रयस्थाने उघडली आहेत. मात्र, ती कुचकामी ठरत आहेत. शहरात विविध भागात अनेक लोक भीक मागतात. मात्र, पाऊस व थंडीच्या वातावरणात बहुतांश निराधारांचा मृत्यू होतो. दरवर्षीच शहरात हे चित्र पाहायला मिळते.
संततधार पाऊस, थंडी आणि भुकेमुळे अशक्तपणा येतो. ‘त्या’ अनोळखी इसमाच्या पायाला दुखापत होती. त्याचा अन्नाविना मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मृत्यूचे निश्चित कारण शवविच्छेदनांतर कळेल.
- सुनीता मेश्राम,
वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रूग्णालय.