जिल्ह्यातील सात बाजार समिती होणार बरखास्त
By Admin | Updated: November 8, 2014 22:30 IST2014-11-08T22:30:00+5:302014-11-08T22:30:00+5:30
जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी प्रशासक मंडळ नेमण्यात आलेल्या पाच आणि मुदतवाढ देण्यात आलेल्या दोन बाजार समित्या बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

जिल्ह्यातील सात बाजार समिती होणार बरखास्त
अमरावती : जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी प्रशासक मंडळ नेमण्यात आलेल्या पाच आणि मुदतवाढ देण्यात आलेल्या दोन बाजार समित्या बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्याने आरूढ झालेल्या भाजप शासनाने हा निर्णय घेतला असून आदेश प्राप्त झाल्यानंतर बरखास्तीची कारवाई करण्यात येईल.
कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये अनियमितता आणि शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे अमरावतीसह राज्यातील सुमारे १७० कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रत्यक्ष कारवाई बाबतचा आदेश धडकताच जिल्ह्यातील सात बाजार समित्या बरखास्त केल्या जातील. सहकार मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, जिल्ह्यात अमरावती, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, अंजनगाव सुर्जी या पाच बाजार समित्यांवर सध्या प्रशासक मंडळ कार्यरत आहे. तर वरूड आणि दर्यापूर या दोन कृषी उत्पन्न बाजार समितींच्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळालेली आहे. या सातही बाजार समित्या बरखास्त होतील. जिल्ह्यात एकूण १३ कृषी उत्पन्न बाजार समित्या अस्तित्वात आहेत.
गेल्या काही वर्षांत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दलालांचा सुळसुळाट झाला आहे. याशिवाय अनियमितता आणि शेतकऱ्यांच्या अडवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा निर्णय जाहीर करताच आघाडी सरकारमधील काँगे्रस व राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींचे भवितव्य धोक्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे या बाजार समित्यांच्या माध्यमातून राजकारणाची पोळी शेकणाऱ्यांनाही हादरा बसला आहे. बाजार समित्या बरखास्तीचा निर्णय शासनाकडून केव्हा धडकतो, याबाबत उत्सुकतेचे वातावरण दिसून येत आहे. (प्रतिनिधी)