अप्पर वर्धाची सात दारे उघडली
By Admin | Updated: September 18, 2015 00:14 IST2015-09-18T00:14:30+5:302015-09-18T00:14:30+5:30
दोन दिवसांपासून अप्परवर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस बरसत असल्यामुळे धरणाची ७ दारे उघडण्यात आली आहेत.

अप्पर वर्धाची सात दारे उघडली
मोर्शी : दोन दिवसांपासून अप्परवर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस बरसत असल्यामुळे धरणाची ७ दारे उघडण्यात आली आहेत. पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा येवा पाहता दारांची संख्या कमी अधिक केली जात आहे.
अप्पर वर्धा धरणाची जलसंचयन क्षमता ३४२.५० मीटरची निर्धारित आहे. आॅगस्ट महिन्यात ही पातळी धरणाने पूर्ण केली. एकूणच धरणात १०० टक्के पाण्याची साठवणूक झालेली आहे. मागील आठवडापासून थांबून थांबून पाणलोट क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस बरसत आहे. त्यामुळे धरणातील जलसाठयात निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त आलेले पाणी धरणाची दारे उघडून सोडण्यात येत आहे. चार दिवसांपासून धरणातील जलस्तराकडे पाहता सुरवातीला २ नंतर ३ आणि आज गुरूवारी १३ पैकी ७ दारे ३० सेंमी उघडण्यात आले आहे. सध्या धरणातून ३४३ घनमीटर प्रती सेकंद एवढा पाण्याचा विसर्ग सुरु आहे. एवढाच पाण्याचा येवा असल्याची माहिती शाखा अभियंता साने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (तालुका प्रतिनिधी)
बगाजी सागरचे ११ दरवाजे उघडले
धामणगाव : धरण क्षेत्रात गुरूवारी सकाळपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे बगाजी सागर धरणाचे ११ दरवाजे १५ से.मी.ने उघडण्यात आले असून त्यातून ११० क्युसेक्स पाण्याच विसर्ग सुरू आहे. आणखी १० दरवाजे उघडण्याची शक्यता धरण विभागाने वर्तविली आहे.